मंगळवार, २१ जुलै, २०१५

‘ते’ गणतीतच नाही


यापुढे टपरीवर चहा प्यायला जाल तेव्हा कटिंग तुमच्या हातात आणून देणाऱ्या लहानग्याच्या बोटावर शाईचा ठिपका उमटलाय का ते जरा बघाल?
सिग्नलवर तुमची गाडी थांबली की बंद काचेवर टकटक करून गजरा समोर धरणाऱ्या लहानगीच्या बोटावर कसली काळी निशाणी दिसतेय का ते जरा निरखाल?
झोपाळू डोळ्यांनी सकाळी सकाळी तुमच्या सोसायटीच्या बाहेरील कचराकुंडीतून काही किडूकमिडूक गोळा करताना एखादा बारक्या दिसला तर त्याच्याही बोटावर अशी काही खूण आहे का ते जरा पाहण्याचा प्रयत्न कराल?
ऊस मळ्यात काम करून कोवळ्या हातांवर पडलेल्या घट्ट्यांकडे पाहताना त्यातील एक बोट निषेधाचा काळा रंग दाखवतोय का हे जरा बघाल?
रानात काठी घेऊन हुरर् हुरर्... हैशा... करत गुरे हाकणाऱ्या एखाद्या काटकुळ्या पोराच्या हाताच्या बोटावर अशी खूण शोधाल?  
हे वर जे काही सांगितले आहे, ते सगळे करून बघा. खात्रीच आहे की मी सांगतेय तशी खूण तुम्हाला फारशी दिसणार नाही. कारण राज्य सरकारने अशी खूण अख्ख्या राज्यभरातील फक्त ५० हजार बोटांवर उमटवली आहे. एवढ्या भल्याथोरल्या, १० कोटींच्या महाराष्ट्रात ५० हजार म्हणजे काहीच नाही की. मग तुम्हाला कुठून ती दिसणार?
आता ही काळी शाई किंवा काळी खूण कसली तर ज्या मुला-मुलींच्या बोटावर ती उमटलेली आहे ती मुले-मुली शाळेत जात नाहीत, याची. राज्य सरकारने मध्यंतरी एक धडाकेबाज मोहीम हाती घेतली. राज्यात शाळाबाह्य मुलांची गणती करायची. सर्वत्र गाजावाजा झाला, पेपरांत फोटो छापून आले, चॅनेलवर बाइट्स झाले. अंदाज जाहीर झाले... की राज्यात शाळाबाह्य मुले मोजली गेली आहेत ती ५० हजार!!! म्हणजे अगदी साधी गोष्ट अशी की टपरीवर चहा देणारा पोऱ्या, गजरे विकणारी लहानगी, कचराकुंडीत काही शोधणारा मुलगा, ऊसमळ्यात काम करणारा लहानगा... आणि ज्या ज्या मुलांच्या बोटावर काळी खूण नसेल ती सारी शाळेत जात असली पाहिजेत. शिकत असली पाहिजेत. पण आपल्या डोळ्यांना तसे दिसत नाही. म्हणजे कुठल्याही वेळी आपण टपरीवर चहा प्यायला गेलो तरी तो पो-या तिथे असतोच. कुठल्याही वेळी आपण सिग्नलवर गाडी थांबवून असलो तरी ती लहानगी हातात गजरे घेऊन उभी असतेच, कचराकुंडीत काहीतरी शोधणारा मुलगा सकाळी दिसतो… दुपारी दिसतो आणि संध्याकाळीही. म्हणजे यापैकी कुणीच शाळेत जात नाही. तरीही त्यांच्या बोटावर शाळाबाह्यची खूण नाही.
मग त्यांच्या बोटांवर खूण करेपर्यंत सरकारची शाई संपली होती? ही मुले सरकारी यंत्रणेला दिसलीच नाहीत? की दिसूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले? तर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला असता सरळसरळ लक्षात येते की सरकारकडे शाई मुबलक आहे. पण ही अशी मुले सरकारी यंत्रणेला दिसली नसावीत... आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिसूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असावे. सरकारी यंत्रणेवरचे हे निराधार व पोकळ आरोप नाहीत, तर वास्तवाला धरून काढलेले हे निष्कर्ष आहेत. या निष्कर्षांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर आपल्या राज्यात एवढीच शाळाबाह्य मुले आहेत, अशी आत्मवंचना आपण करून घेत राहू आणि शाळेचा टोल न ऐकलेली, वह्या-पुस्तके हाती न घेतलेली, अक्षर-आकड्यांपासून दूरच राहिलेली मुले बोटावर काळी खूण न उमटताही गणतीबाहेरच राहतील.   
राज्याच्या शैक्षणिक प्रगतीच्यादृष्टीने ही अशी शाळाबाह्य मुले शोधण्याची मोहीम खरोखरच स्तुत्य आहे. गफलत आहे ती मोहीम राबवण्याच्या पद्धतीत. नियोजन आणि उद्देशातील खोटच या महत्त्वाकांक्षी योजनेला मारक ठरली नि बिल्डिंगमधील घरांची बेल वाजवत ‘गणती’ करून कागदोपत्री रेघोट्या उठल्या. मूळात या सर्वेक्षणातील उद्देशच वास्तवाला धरून नाही. शाळेमध्ये सलग एक महिना गैरहजर असणाऱ्या मुलाला शाळाबाह्य गणले जाते. त्यातील एक दिवस जरी संबंधित मुलगा शाळेत आला तरी तो पटावर असतो. मात्र, १५ जूनला शाळा सुरू झाल्याने सर्वेक्षणाच्या दिवसापर्यंत शाळा सुरू होऊनच एक महिना झाला नसताना ही गणती करण्याचे नियोजन झालेच कसे, हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळेच केवळ पटावर आहे, म्हणून अनेक मुलांना मोजलेच गेले नाही. तसेच केवळ एका दिवसात गणती करण्याचे नियोजन का झाले, हा प्रश्नही अनुत्तरितच आहे. या मुलांना शोधण्यासाठी निश्चित कालबद्ध अशा कार्यक्रमाची आवश्यकता असताना केवळ एक दिवस ठरवून डोकी मोजण्याची औपचारिकता पार पाडली गेली. त्यामुळे गेली अनेक वर्षे रस्त्यावर फिरणारी, बालकामगार म्हणून हॉटेलांत, गल्लीबोळात, घराघरात राबणारी, भूक भागवण्यासाठी दारोदार फिरणाऱ्या मुलांचे अस्तित्व त्यांची गणती न करून पुन्हा एकदा नाकारले गेले. शिक्षणमंत्र्यांनी सर्वेक्षणात काही तरी चुकले, असे मान्य करण्याचा ‘मोठे’पणा दाखवून स्वतःची सोडवणून करून घेतली. पण, त्यामुळे शिक्षणसंधी नाकारल्या गेलेल्या मुलांच्या आयुष्यात बदल तर नाही होणार ना?
डोंबारी, कोल्हाटी, बहुरूपी, वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी कामगार, दगडखाण कामगार, तमाशा कलावंतांच्या मुलांना शिक्षणमार्गावर आणण्याचे मोठे आव्हान आज आहे. त्यामुळेच या सर्वेक्षणासंदर्भाने झालेल्या बैठकांमध्ये स्थलांतरितांचा वेगळा उल्लेख करण्यावर एकमत झाले होते. स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आणि सरकार यांच्या पातळीवर चर्चा झाल्या होत्या. त्यानुसार स्थलांतरित लोकांची वेगळी आकडेवारी तयार करण्यात येणार होती. म्हणजेच शाळाबाह्य मुलांबरोबरच फिरता समाजही कागदावर नेमका उतरला असता. त्यासाठी सरकारी यंत्रणा राजी झाल्याने सामाजिक संस्थाही या सर्वेक्षणबाबत आशावादी होत्या. मात्र, अखेरच्या क्षणी जे फॉर्म हाती आले, त्यातून ही महत्त्वाकांक्षी आणि त्रासदायक ठरेल, अशी गणती काढून केवळ मुले शाळेत जातात की नाही, इथपर्यंतच अर्ज मर्यादित करण्यात आले. या मंडळींची फिरती, स्थलांतर रोखण्याची रोजगार क्षमता आज आपल्याकडे नाही. त्यामुळेच त्यांचा नेमका आकडा शोधून, त्यांची परिस्थिती, स्थलांतर लक्षात घेऊन त्यादृष्टीने शिक्षण यंत्रणा उभारण्याची आणि या मुलांना नवे आयुष्य देण्याची संधी चालून आली होती. साखरशाळांसारख्या महत्त्वाकांक्षी मात्र फारशा न चाललेल्या उपक्रमांप्रमाणेच नव्या ठिकाणी मुलगा लगेच शिक्षण दिनक्रमात सामावला जाईल, यादृष्टीने नियोजन करता आले असते. त्यासाठी आवश्यक यंत्रणा, आराखडा नियोजन याबाबत विचार करता आला असता. मात्र, एवढी मोठी जबाबदारी पेलण्यापेक्षा ती नव्याने टाळली गेल्याने या मंडळींसाठी केवळ कागदोपत्री असलेला शिक्षणहक्क पुन्हा कागदावरच राहिला.
दुर्गम भागातील अनेक मुलेही सर्वेक्षणाच्या माध्यमातून शाळेच्या पटावर येणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या मुलांपर्यंतही यंत्रणा पोहोचलीच नाही. दुर्गम भागात आणि त्यानंतर या मुलांपर्यंत पोहोचणे हेच आव्हान. त्यातही त्यांचे कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करत असेल, तर या मुलांचा माग ठेवणे, त्यांना वारंवार शाळेत आणून बसवणे, हे अत्यंत क्लिष्ट असते हो! त्यापेक्षा या मुलांना मोजणे नको आणि नंतर त्यांच्या मागे फिरणेही नको, अशी मते यवतमाळ जिल्ह्यात गणतीच्या कामी असलेल्या शिक्षकांनी व्यक्त केली. त्यातही आजवर शिक्षणाचा गंध नसलेली ही मुले शाळेपर्यंत आलीच तर त्यांची तयारी करून घेणे, अभ्यास घेणे, त्यासाठी ज्यादा वेळ खर्ची घालणे, यासारखे दिव्य आमच्याच माथी येणार. त्यापेक्षा त्यांना पटावर आणणेच नको, अशा या शिक्षकांच्या भावना होत्या आणि त्या त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या लोकांपुढे मांडल्याही. यवतमाळ जिल्ह्यातील ही मते राज्यातील प्रातिनिधिक उदाहरण मानता येईल. म्हणजेच अशा असंख्य मुलांचा शिक्षण हक्क जाणूनबुजून डावलला गेल्याचे उघडच आहे. यवतमाळपासून आठ ते दहा किमी अंतरावरील गावांमध्येही शिक्षक गणतीचे बाड घेऊन पोहोचले नसल्याचे युवा वेध मंचचे सुनील भेले सांगतात.
यवतमाळसह राज्यातील अनेक दुर्गम भागामध्ये हा प्रकार असताना काही ठिकाणी कागदोपत्री हजेरी असण्याचे पराक्रमही केले आहेत. शिक्षक संख्या आणि अनुदानांच्या गणितासाठी अनेक मुलांना पहिलीला शाळेच्या पटावर दाखल करून घेतले जाते. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत मुलांना नापासही करायचे नसते. त्यामुळे ही मुले एकदा पटावर आली की ती शाळेत आली किंवा नाही तरी त्यांना पटावरूनही काढले जात नाही आणि त्यांच्या न येण्याचा पाठपुरावाही होत नाही. या मुलांची नावे पटावरून कमी केली तर आपसूकच त्या शाळेतील आवश्यक शिक्षकसंख्याही कमी होण्याचा म्हणजेच बदलीचा धोका असतो. त्यामुळेच ते टाळण्यासाठी खेड्यातील, दुर्गम भागातील शाळांमध्ये पहिलीत पटावर आलेल्या मुलाला आठवीपर्यंत पटावर नेण्याचे काम चोख पार पाडले जात असल्याची वस्तुस्थिती बीडच्या दीपक नागरगोजे यांनी अभ्यासाअंती मांडली आहे.
विदर्भातील अनेक दुर्गम भागांमध्ये आज बालकामगार, आदिवासी, कुमारी माता यांचे प्रश्न मोठे आहेत. असे असताना येथील सगळी मुले शाळेत जातात, हे एक वाक्यच फसवेपणा सिद्ध करते. विदर्भातील एका तालुक्यात गेल्या वर्षी ३८१ शाळाबाह्य मुले होती. मात्र, सध्याच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ४०० शाळाबाह्य मुले असल्याचे नोंदवण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुका. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भाग आणि आदिवासी बहुल तोंडवळा. सरकारच्या दफ्तरी केवळ एक मुलगा शाळाबाह्य. इतक्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजातील सर्व मुले शाळेत जात आहेत. त्यातही स्थलांतरितांची मुले नव्या ठिकाणी लगेचच शाळा दाखलही झाली, अशी आदर्श परिस्थिती राज्यात आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला. बीड जिल्ह्यातील पाटोदासारख्या ठिकाणी १०० मुले हॉटेलातच काम करत असतील, असे असताना तिथे केवळ १४ मुले शाळाबाह्य दाखवण्यात आली. याच जिल्ह्यातील अगदी छोटा म्हटला जाणारा शिरूर तालुका. गेल्यावर्षी तब्बल साडेसात हजार मुले शाळाबाह्य होती. शाळेत असणारी ३२०० मुलेही ऊसाच्या फडात आई-बापांबरोबर बरोबरीने काम करत होती. पण, सरकारच्या ‘जनजागृती’च्या झपाट्याने काय किमया साधली नि हा आकडा झर्रकन खाली आला, असे नागरगोजे निदर्शनास आणून देतात. सरकारी आकडेवारीनुसारच राज्यात अडीच लाख बालकामागार आहेत. म्हणजेच ही मुले शाळाबाह्य आहेत. याशिवाय स्टेशनांवर, रस्त्यावर, गल्लीबोळात फिरणारी अनेक मुले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे विश्वस्त असलेल्या ‘स्पार्क’ संस्थेने एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाअंती राज्यात ६३ लाख ९६ हजार १७१ मुले शाळाबाह्य असल्याचे म्हटले होते. मात्र, मंत्र्यांच्या संस्थेचे अहवाल खोटे ठरवत ५० हजार मुलांचा ‘नवा’ अहवाल सरकारी यंत्रणांनी मांडला. राज्य सरकारच्याच नोव्हेंबर २०१४च्या आकडेवारीनुसार एक लाख ४५ हजार मुले शाळाबाह्य असल्याचे म्हटले होते. म्हणजे सहा महिन्यात ‘तत्पर’ यंत्रणेमुळे एक लाख मुले पटावर आली, असे म्हणायचे का? एकट्या मुंबईचा विचार केला तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजने गेल्या वर्षी केवळ रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये ३७ हजार ५९ मुले प्लॅटफॉर्म आणि रस्त्यावर राहत असल्याचे म्हटले होते. म्हणजे ही सगळी मुले शाळाबाह्य होती. पण सरकारी सर्वेक्षणात केवळ आठ हजार मुले शाळाबाह्य असल्याचे ‘दाखवण्यात’ आले आहे.
शाळाबाह्य मुलांची नियोजनबद्ध आणि ठराविक कालावधीमध्ये सलग गणती झाली असती तर आज १२ ते १३ वर्षांच्या असलेल्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळाली असती. शिक्षण हक्क कायद्यानुसार ८ ते १४ वर्षांची मुले शाळेत असणे आवश्यक असते. त्यामुळेच या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याची सरकारनेच निर्माण केलेली मोठी संधी दवडून त्यांना जगण्याचा योग्य मार्गच नाकारल्याचे चित्र आहे. कदाचित  त्यांच्यासाठी ही शेवटची शिक्षणसंधी होती.
सरकारने अशाप्रकारची गणती करण्याचा विचार करून खूप चांगले पाऊल उचलले होते. आजवर समाजाने, सरकारने ज्यांचे अस्तित्वच नाकारले होते, त्यांचे असणे मान्य केले जाणार होते. खरं तर प्रत्येक मूल शाळेत येण्यासाठी सरकार, सामाजिक संस्था आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने एकत्र येऊन या प्रश्नावर काम करण्याची आवश्यकता आज आहे. त्यामुळेच या गणती कामी सरकारने गांभीर्य आणि खरी इच्छाशक्ती दाखवली असती, मुलांशी संबंधित काम करणाऱ्या विविध संस्थांना हाताशी धरून कालबद्ध मोहीम राबवली असती, तर त्याचे खूप सकारात्मक परिणाम हाती आले असते. मुले हेरण्याचे, नोंदवण्याचे काम चोख झाले असते तर अंमलबजावणीच्या पातळीवरही सखोल विचार करता आला असता. मात्र, सर्वेक्षणातच खोट असल्याने हे सारेच जर-तरमध्ये जमा झाले आहे आणि असंख्य चिमुकल्या जीवांना उत्तम, चांगले, सुशिक्षित नागरिक म्हणून घडवण्याच्या जबाबदारीतून मान अलगद काढून घेत न केलेल्या कामाचा डिंगोरा पिटत स्वतःची पाठ थोपटण्यात यंत्रणा, सरकार मश्गुल आहे. तर रस्त्यावर, डोंगरदऱ्यात, हॉटेलांमध्ये राबणारे नि दारोदार भटकरणारे चिमुकले हात यापुढेही असेच राबत राहणार आहेत.

शनिवार, ११ जुलै, २०१५

क्षितिजापर्यंत… क्षितिजापल्याड


हिरव्यागार झाडांनी लपेटलेला डोंगर, अस्ताला निघालेला सूर्य, मावळतीच्या या सूर्याचे क्षितिजावर पसरलेले रंग आणि दूरवर डोंगर नि निळ्याशार आभाळाची विस्तीर्ण पसरलेली रेघ… अगदी लहानपणापासून मनात कोरलं गेललं, कागदावर चित्र, कविता, कल्पनाविस्ताराच्या माध्यमातून उतरवलेलं हे निसर्गरूप. डोंगर आणि आभाळाची किंवा निळ्याशार आकाशाची नि निळाईशीच स्पर्धा करणाऱ्या पाण्याची दूरवर होणारी भेट नेहमी कुतुहल वाढवणारीच ठरली. तिथपर्यंत आपण पोहोचायचंच नि हे मिलन याचि देही याचि डोळा पहायचं… असं अगदी लहानपणच्या वेड्या मनातील स्वप्न. पण, निसर्गाचं भरभरून दान मिळालेल्या काश्मीरच्या भूमीमध्ये पाऊल ठेवले नि बालपणीचं खोल मनात असलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात आल्याचा भास झाला. उंचच उंच पहाड, त्यावर आच्छादलेला बर्फ कोणता आणि आकाश कोणते असा संभ्रम निर्माण व्हावा, इतकं एकरूप झालेले आकाश… आपल्या स्वप्नातल्या ‘त्या’ दूरवर विस्तारलेल्या क्षितिजापर्यंत तर आपण आलोच आहोत. पण आता त्याही पलिकडे काही आहे… आणखी एक सुंदर जग खुणावतंय… असा नवा सुखद आभास मनात निर्माण झाला आणि क्षितिजापल्याडच्या या दुनियेमागे नव्याने मन धावू लागलं.

कडाक्याची थंडी, बोचरे वारे, हिमवर्षाव… हे श्रीनगर किंवा काश्मीरचं अगदीच ढोबळ वर्णन म्हणता येईल. पण, काश्मीरचे सौंदर्य वर्णायचं तर त्याबरोबरीने ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि अतिशय सुंदर मन असलेली सुरेख माणसे यांचाही उल्लेख करावा लागेल. रंग, गंध आणि सौंदर्याशी स्पर्धा करणारे फुलांचे ताटवे आणि शांत पाण्याचे तलाव तासनतास काठावर बसून राहण्यासाठी मोहात पाडतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विस्मरणात गेलेला आणि खर तर स्वतःमध्ये डोकावण्यासाठी हवा असलेला निवांतपणा अशा निश्चल पाण्याकाठी आणि सौंदर्याची उधळण करणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात मिळाला, तर यापेक्षा वेगळी पर्वणी ती काय?




काश्मीरमधील निसर्गाचं वैविध्य सतत चकीत करणारं…लोभस आणि खिळवून ठेवणारं! श्रीनगरकडून लेहच्या दिशेने जाताना त्याचा वारंवार प्रत्यय येतो. बर्फाच्या शिडकाव्याने होणारी प्रवासाची सुरुवात आणि त्यानंतर कुठे पांढरी, कुठे काळी-तपकीरी अशा दिसणाऱ्या छटा. पांढऱ्या शुभ्र खळाळत्या पाण्याचे प्रवाह प्रसन्न स्वागत करतात. जसंजसं लेहच्या दिशेने आपण चढू लागतो, तसतशी ऑक्सिजन परीक्षा पाहू लागतो. जगण्यासाठी आवश्यक असलेल्या या ऑक्सिजनची नेमकी किंमत आपल्याला ​इथल्या मुक्कामात कळते. सभोवतालचे शुभ्र गालिचे खुणावू लागतात आणि थंडीनं चौफेर आक्रमण केलेलं असतं. या साऱ्याच बदलाशी जुळवून घेत निसर्गाचं रूप डोळ्यात साठवण्यात वेगळीच मजा आहे. इथला बर्फ म्हणजे तरी किती? डोंगरावरून खाली वाहत आलेलं पाणी जागच्या जागी थबकावं आणि गोठून जावं… त्यानंतर दिसणारं दृश्य केवळ विलोभनीय. कुठे खुरट्या हिरव्या झाडांनी मध्येच डोकं वर काढलेलं. रंगाच्या या नैसर्गिक छटा गमतीशीर वाटतात.



फटुला पास, जोजिला पास यासारखे थांबे उंचीच भान देत राहतात. चहूबाजूंनी बर्फानं लगडलेले पहाड संपतात नि अगदी बाजूलाच अक्राळविक्राळ रूप असणारे खडक अंगावर येतात. त्याच रूप ओबडधोबड, काहीसं भीतीदायक. त्यानंतर अगदी खास वलयांकित घडी उमटलेलं गुळगुळीत रूप समोर येतं नि निसर्गाच्या या वैविध्यपूर्ण आविष्काराची मजा वाटते.

वळणावळणाचा हा मार्ग आपण चढू लागतो. त्यानंतर कुठे रस्त्यावर येऊन पडलेले बर्फाचे ढीग वाट अडवतात, तर कुठे हिमवर्षाव थांबवतो, कुठे मोठा खडक रस्ता रोखून धरतो. त्यामुळेच विनासायास ही वाट कापायला मिळणं, ही देखील मोठीच गोष्ट. झंस्कार आणि सिंधू नदीचा संगम म्हणजेही लोभस दृश्य. या दोन नद्या एकमेकींशी एकरूप होताना आपला मूळ रंग, रूप सोडत नाहीत. त्यामुळे संगमानंतरही या दोन्ही नद्यांचे वेगळेपण जाणवत रहातेच. या नदीच्या थंडगार पाण्यात, त्याच्या लाटांवर स्वार होत सफर करणे म्हणे थ्रिलच.

वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृत, खास धाटणीची बौद्ध विहार, बैठ्या ठेवणीची घरे, तिबेटी लोकांचा वावर हा या लेह शहराचा तोंडवळा. या शहरातील मॉनेस्ट्री, शांती स्तूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उभारणीचे. लडाखच्या सफरीत लेहची भेट मध्यवर्ती. इथून पुढे जायचे नि इथे परतायचे हा सफरीचा शिरस्ता. त्यामुळेच नुब्रा व्हॅलीकडे जा किंवा पॅगाँगच्या अद्भुत निसर्गाकडे… फिरून लेहला येणे ठरलेले. त्यामुळेच दोन दिवसांत हे शहर आपले, ओळखीचे वाटू लागते ते अगदी तिथून निघाल्यानंतरही…


Nubra valley

नुब्रा व्हॅलेकडे जाणारा रस्ताही गोठवणाऱ्या थंडीचाच. हा मार्ग म्हणजे लडाख सफारीचा एक अवघड टप्पा. १८ हजार ३८० फूट उंचीवर असलेल्या खारदुंगला पासवरून ही वाट जाते. बर्फवृष्टी आणि सभोवताली असलेल्या बर्फाच्या आच्छादनातून निघालेली चिंचोळी वाट, तीव्र वळणांचे रस्ते आणि निसर्गाचं आणखी एक रम्य रूप. कधी लांबच लांब वाहनांची रांग तर कधी दरडींनी अडवलेले रस्ते… असे नाना अडथळे पार करत जेव्हा ही वाट नुब्रा व्हॅलीकडे जाते तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. अगदी आपण राजस्थानात आहोत, असा भास व्हावा असे येथील वाळवंट. सभोवताली वाळूच वाळू आणि उंटाची सफारी. नुब्रा व्हॅलीतील मॉनेस्ट्री आणि तिथपर्यंत जाणारा रस्ता आपल्याला निसर्गाच्या प्रेमात पाडतो.

नुब्रा व्हॅलीप्रमाणेच निसर्गाचं आणखी एक रूप दिसतं ते पॅगाँगमध्ये. पॅगाँगकडे जाणारी वाट जितकी खडतर, तितकाच तेथील निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेला. निळेशार पाणी, त्याच निळ्या रंगाशी स्पर्धा करणारे आकाश आणि स्वच्छ किनारा. आकाशाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या बदलणाऱ्या छटांनुसार बदलते रंग धारण करणारे पाणी मोहून टाकते. नुब्रा आणि पॅगाँग या दोन्ही दिशांना जायला मिळणार की नाही, हे येथील लहरी निसर्ग ठरवतो. लेहपासून या दोन्ही ठिकाणांना जोडणारा एकमेव पर्याय असल्याने अतिबर्फवृष्टी, दरडी यावर येथील रस्ता खुला आहे की नाही, हे ठरते. पण, निसर्गानं साथ दिली, तर स्वर्गसुख म्हणजे काय, याचे प्रत्यंतर नक्क येते.
Pangong view 1
 
Amazing Pangong
निसर्गाच्या वैविध्याचं, सौंदर्याचं जितकं आपल्याला अप्रुप वाटतं, तेवढंच आपण येथील लष्करासमोरही नतमस्तक होतो. निसर्गाची वेगवेगळी आक्रमणे, प्रतिकूल परिस्थिती यामध्येही टिकून राहण्याच्या त्यांच्या धैर्याला सलाम! लडाखमधील निसर्गाच्या सर्व रूपांशी हे जवान सतत तयार राहून दोन हात करतात. लोकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे राहतात. येथील प्रत्येक अचणीत, परीक्षेत लष्कर हेच उत्तर. निसर्गाच्या प्रत्येक अडचणीत, लोकांच्या सुरक्षिततेत जवान तत्पर असतात. त्यामुळेच लष्करी जवानांबाबतचा आदर इथल्या भेटीनंतर शतपटीनं वाढतो. द्रासमधील वॉर मेमोरियल तर कारगील युद्धातील थरारक आठवणी जिवंत करते. त्यांचे शौर्य, परिस्थितीशी, शत्रूशी दोन हात करण्याची क्षमता, वेळप्रसंगी जिवाची बाजी लावण्याची तयारी, सगळंच रोमांचकारी आणि त्याबरोबरच हलवून टाकणारं. या मेमोरियलमधून बाहेर पडताना मनात एकाच वेळी वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ होतो. आपल्या जवानांना, त्यांच्या परिश्रमाला मनापासून सॅल्यूट!

लडाखमधील भ्रमंतीमध्ये सर्वात मोठी परीक्षा म्हणजे येथील प्रवास. निसर्गाच्या रौद्ररूपामुळे अजूनही अनेक भागांमध्ये रस्ते पोहोचलेले नाहीत. अनेक वाटा धोक्याच्या. अनेक ठिकाणी पोहोचणेही कठीण. अशा स्थितीत येथे रस्ते उभारणीचे कठीण काम बीआरओ आणि हिमांककडून केले जात आहे. रस्ते उभारणीचे आव्हान पेलताना लोकांना पावलोपावली जीवाचे मोल समजावून सांगणारे बोर्ड लावत सावध प्रवासाचा सल्ला देतात. या रस्त्यांवर वैद्यकीय सुविधा मात्र दुर्लभ. लष्कराच्या पोस्ट वगळता कितीतरी दूरपर्यंत फर्स्टएडही उपलब्ध नाही. त्यातच दरड कोसळली, हिमवर्षावाने वाट अडवली तर पेशंटच्या जिवावर बेतण्याचीच भीती अधिक. त्यामुळेच येथील प्रवास वैद्यकीय सोयींसह करणेच हिताचे ठरते.

प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होत असताना लडाखमधील लोकांसाठी रोजगाराच्या संधी मात्र अजूनही मर्यादितच आहेत. शेती, पारंपरिक पश्मिना शाली, कलाकुसर आणि पर्यटन एवढेच पर्याय येथे उपलब्ध दिसतात. त्यातही पर्यटन व्यवसाय चारच महिन्यांपुरता असल्याने तरुणांना आजही वेगळ्या वाटा आजमावण्याची संधीच नसल्याचे ​चित्र आहे.

काश्मिरी लोक आणि तिबेटी संस्कृतीचा प्रभाव असलेली लडाखमधील मंडळी यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये बरंच अंतर. दोन्ही माणसांच्या स्वभावामध्ये गोडवा असला, तरी त्यातील अंतर लख्ख जाणवंतच. लेहमधील निसर्ग, त्याचे वैविध्य यामध्येच एक अगत्यशीलता आहे. साहजिकच आठ महिने निसर्गाची परीक्षा दिल्यानंतर येणाऱ्या आल्हाददायी वातावरणात आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या येथील आर्थिक गणितांमुळे काश्मिरी लोकांच्या तुलनेत येथील मंडळींमध्ये अधिक मृदुता आहे. त्यांची अगत्यशीलता कृतीतून ओतप्रोत जाणवते. आपल्याला सुखावतेही.

सतत सुरक्षित, कम्फर्ट लेव्हल बघून, जीवाला अगदी जपून शहराच्या सुखसोयींमध्ये जगणारे आपण निसर्गाच्या कठोर-सुंदर रूपाचा अनुभव घेण्यास कचरतो, घाबरतो. ही परीक्षा निश्चित थोडी कठीण, पण तेवढीच आनंद देणारी, ओतप्रोत समाधान देणारी आणि खूप काही मनात साठवता येणारी असते. जून महिन्यामध्ये माझ्या पाच मैत्रिणींसह केलेली ही सफर त्यामुळेच वेगळी ठरली. पावलोपावली निसर्ग, हवामान परीक्षा पाहत असतानाही येथील सौंदर्य आम्हाला आणखी पुढे जाण्यास उद्युक्त करत राहिले. थंऽऽऽडी म्हणजे नेमके काय, हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले. बर्फ अंगावर झेलत उभे राहताना थंडीत विनातक्रार सज्ज राहणारे जवान दिसले नि स्वतःच्या चोचल्यांचा रागच येऊ लागला. आयुष्यात खूप काही देणारा, समृद्ध करणारा हा अनुभव. असंख्य पॅकेजची चाचपणी, एअरफेअरच्या गप्पा, आर्थिक गणिते, दोन महिने पुरून उरलेली चर्चा आणि त्यानंतर झालेली ही सफर. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या काश्मीरचे देखणे, लोभस, थक्क करणारे आविष्कार याचि देही याचि डोळा पाहिले आणि मन समाधानाने काठोकाठ भरले.

निघताना येथील मंडळींना, लेहला आणि निसर्गाला मनापासून ‘झुले’ (नमस्कार) केला!!!