मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

‘डिजिटल’ भारताची ‘ग्राऊंड रिअॅलिटी’


राजस्थानच्या गंग्रार गावातील ही घटना. रतन लाल जाट 35 वर्षांचा पंचायत सदस्य. गावातील, जातीतील प्रथाआणि मोठेपणासाठी अगदी धोकापत्करून त्याने धाडसीपाऊल उचलले. जातीतीलच एका मुलीला बायकोचा दर्जा देण्याचा मोठेपणा त्याने केला, तोही पहिले लग्न झालेले असताना. या लग्नाची कानोकान खबर लागू नये याची पुरेपूर काळजी घेत त्याने लग्न उरकून मुलीला तिच्या आईवडिलांकडेच राहू देण्याचा शहाजोगपणा केला. या सगळ्यामागे कारण होते ते या मुलीचे वय. अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचा हा नवरा’ ‘मालक’. पोलिसांपर्यंत ही खबर सोशल मीडियातून पोहोचली नि बालविवाह कायद्याच्या उल्लंघनाखाली त्याला अटक झाली. पण हा एक रतनलाल आज अटकेत आहे. पण, अशा अनेक रतनलालला बालवधूमिळवून देणारा एजंट मात्र फरार आहे. तो हाती लागला की असे किती बळीगेले, याचे समोर वास्तव धक्कादायक असेल.
.
नागपूरच्या विवेकानंद नगरातील शाळेत तीआठवीत शिकत होती.  तिला खरंतर शिक्षणाची प्रचंड आवड. मात्र, १३ वर्षांची असतानाच तिचे काका आणि वडिलांनीछत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात लग्नाचा घाट घातला आणि मुलीच्या शिक्षणाची वाट धूसर झाली. जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळाली. त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करून तिचा विवाह थांबवला. एका अर्थाने ती सुदैवी ठरली, एवढेच समाधान.
…………………..
माझ्याकडे गेल्या सात वर्षांपासून ती घरकाम करते. पश्चिम बंगालहून आपलं बस्तान आवरून इथे रोजगाराच्या शोधात आली. तिचं वय फार तर ३५ ते ४०च्या दरम्यान असावं. त्यात तिला दोन मुले, दोन मुली आणि मुख्य म्हणजे नातवंडही! तिचं असंच अगदी लहान वयात लग्न झालं. मात्र, तिच्या दोन मुलींना पश्चिम बंगालमध्ये ती शिकवतेय याचं समाधान वाटत होतं. पण मुलगी साधारण १४ वर्षाची झाली आणि ही तिच्या लग्नाविषयी काही बाही सांगू लागली. माझ्या परीनं अतिशय ठाम विरोध केला. मुलीचं लग्न लवकर का करू नये, हे समजावण्यापासून ते माझ्या घरचं काम बंद होईल, इथपर्यंत सगळं सांगितलं. त्यामुळे हा विषय तिनं थांबवला. मात्र, दरवर्षीप्रमाणे एक महिना गावाला गेली नि मुलीचं लग्नच करून आली. वर्षभराच्या आत पाळणा हलला. दिदी आपको पता है, मेरी बेटी का बहुत खून निकल गया, उसकी डिलव्हिरी के टाइम. डाक्टर तो बोल रहा था उसका बचना भी मुश्कील है! हमने दो बोतल खून चढाया तभी उसने आँख खोली!.. असं एकेदिवशी घाबरत ती सांगू लागली.  त्याला आता दोन वर्ष झाली आणि पुन्हा तिला अॅनिमियामुळे औषधपाणी करण्याची वेळ आलीये. साहजिकच १६ व्या वर्षी बाळंतपण झाल्यावर हे होणारच लग्नाची घाई करू नको, असं मी सांगितलेलं ना तुला या माझ्या वाक्यावर गाव में सबकी इसी उम्र में शादी होती है! नही तो बाद में लडका नही मिलता उसको घर बिठाऊँ क्या तिचा सवाल
देश बदलतोय विचार अतिशय आधुनिक झालेत आमचे! कम्प्युटर, मोबाइल वापरणारी आम्ही मंडळी अतिशय शहाणी झाली आहोत, असं म्हणत स्वतःची पाठ आपण थोपटून घेत असतो. मात्र, शहाणपण म्हणजे नेमकं काय? आधुनिकता म्हणजे काय? जर विचारांची पातळीच उंचावणार नसेल आणि शिक्षणाने विचार साक्षर होणार नसतील तर बदल झालाय म्हणजे काय? पुरोगामित्वाचे ढोल बडवताना या ग्राऊंड रिअॅलिटीबाबत कधी तरी गांभीर्याने विचार कुणी करतं का?
देशामध्ये १८ वर्षांखालील मुलींचा आणि २१ वर्षांखालील मुलांचा विवाह बालविवाह मानला जातो. देशात आजही ४१ टक्के विवाह हे बालविवाह होत असल्याचे युनायटेड नेशन्सचा अहवाल म्हणतो. १० ते १४ आणि १५ ते १९ या कालावधीमध्ये मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण आजही खूप मोठे आहे. लहान वयात होणारे लग्न, समज येण्याआधीचे लादले जाणारे मातृत्त्व यामुळे या मुलींना आजही अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. त्यातील अनेकांना हुंड्यासह अनेक कारणांसाठी सासरच्यांचा छळ सहन करावा लागतो. शरीराला न पेलवतील इतकी कामे उपसावी लागतात. त्यातूनच लहान वयात त्यांच्या आरोग्याचे प्रश्न उपस्थित होतात.
राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरयाणा या राज्यांमध्ये आजही सर्रास बालविवाहाची प्रथा रूढ आहे. मात्र, फार पूर्वीपासून सुधारणेचा वसा घेतलेल्या महाराष्ट्राची स्थिती तरी कुठे वेगळी आहे? ब्रिटीश काळात बालविवाहबंदीच्या चळवळीने राज्यात जोर धरला. महात्मा फुलेंपासून अनेक समाजसुधारकांनी या मानसिक बदलासाठी जोडे झिजवले. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटली तरी सुधारणेचे बीज अजूनही पुरते रूजलेलेच नाही. सोन्याचे तोळे आणि पैशांच्या लगडींवर कायद्याचे भय न बाळगता बड्या आणि स्वतःला शिकलेले, पुढारलेले म्हणवणाऱ्या घरांपासून गरीबांपर्यंत सर्वांचे विवाहसंबंध ठरतात. डबल ग्रॅज्युएट असणाऱ्या आणि लाखांच्या घरात पैसे कमावणारा सुशिक्षित घरांपासून ते हातावर पोट असणाऱ्या गरीब घरांपर्यंत सगळीकडे वंशाच्या दिव्याचा अट्टहास दिसतो.  महानगरांना जोडून असणाऱ्या शहरांमध्ये किंवा मोठमोठ्या टॉवर्सच्या सावलीत असणाऱ्या वस्त्यांमध्ये ही स्थिती तर छोटी गावे आणि पाड्यांबाबत काय म्हणावे? आज अगदी छोट्या शहरांमध्येही माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींचे विवाह होतात. आम्ही बदललोय असं आपण म्हणत असू तर तो केवळ पोशाखी बदलच म्हणावा लागेल. कारण प्रत्यक्षात अपेक्षित बदलांची परिस्थिती चारच घरांपुरती स्तिमित आहे. आपल्या ओळखीच्या घरांमध्येही असेच प्रकार आपण सहज बघतो. काणाडोळा करत घडू देतो किंवा आपल्याला काय करायचंय म्हणत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. मग परिस्थिती बदलणार कशी? विचारांचं शहाणपण येणार कसं?
राज्यातील  बालविवाहांची योग्य नोंदणी करत नसल्याचा ठपका मध्यंतरी  'कॅग'च्या अहवालात ठेवण्यात आला. २०१३-१४ या वर्षांत १० ते १४ वयोगटातील याच वर्षांत १५ ते १९ या वयातील ११,८३९ मुलींचे विवाह झाले असतानाही शासनाने कमी आकडे दाखवल्याचे निरीक्षण कॅगने नोंदवले. २०१० ते २०१३ या काळात राज्यात फक्त ४५ बालविवाह झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, राजकीय, सामाजिक, आर्थिक असे कोणतेच लाभ मिळवून न देणाऱ्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहाच कशाला, या सरकारी मनोवृत्तीमुळे आजही अनेक मुलींच्या आयुष्याचे डाव पणाला लागताहेत.

उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, राजस्थान आणि झारखंड या राज्यांत तर जातपंचायतीच्यारूपाने बालविवाह कायदेशीर ठरवणारी व्यवस्थाच उभी आहे. मग त्याला धक्का कोण आणि कसा लावणार? देशभरातील १९ वर्षे वयाच्या मुलींपैकी ४१ टक्के मुलींची लग्ने आधीच झालेली असल्याची माहिती पुढे येते, तेव्हा या सामाजिक व्यवस्थेतील फोलपणा ढळढळीत समोर येतो. जातपंचायतींना स्वतःची व्होटबँक मानून जोवर पोसले जाईल, बालविवाहासारख्या सामाजिक प्रश्नाविरोधात जोपर्यंत कायद्याचा कठोर बडगा उभारला जात नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार तरी कशी? हा प्रश्न माझा नाही, याचे मला काय करायचे ही मानसिकता मूळापासून बदलण्याची  गरज आहे. अन्यथा डिजिटल भारतात सामाजिक अधोगतीची शोकांतिकाच पहावी लागेल.