मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

आतला आवाज ऐकू या!

 

आत्महत्येसारख्या घटनेनंतर बोलायला हवं होतं, कुणाला बोलावं वाटलं तर मी आहे वगैरे म्हणण्यापेक्षा जवळच्या एका तरी मनाची खळबळ ओळखू इतकं कुणाचं आपण होऊ शकू का, हा प्रश्न विचारू या स्वत:ला.



ज़िंदगी यूँ हुई बसर तन्हा 

क़ाफिला साथ और सफ़र तन्हा

सभोवतालचं जग आनंदानं वावरत असतं, गाड्यांचे आवाज-माणसांचा वावर जाणवत असतो, पक्षी-प्राणी त्यांच्या परीनं विहार करत असतात, दोस्तांचा-नातेवाईकांचा-सहकाऱ्यांचा-जोडीदाराचा हात हातात असतो, बरं सोशल मीडियावर मुबलक वावर असल्यानं तिथला गोतावळाही मोठा असतो, सकाळपासून रात्रीपर्यंत आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं असतं, मन आणि वेळ रिकामा राहण्यासाठी जागाच नसते हे असं सगळं असताना एकाकीपण, अस्वस्थता, नैराश्य कसं आणि कुठून येतं असावं? आपल्या व्यस्त आयुष्यात शिरकाव करण्याची संधी त्याला कशी-कुठून मिळत असावी? ही सगळी खळबळ होत असताना ती व्यक्त करण्याचं धैर्य, गरज, इच्छा, खुलेपण यातलं काही डोकावत असेल का मनाच्या कोपऱ्यात

प्रश्नांचं काहूर उठतं या सगळ्या विचारांनी आणि मग वाटतं, ज्या गोतावळ्याचा अभिमान आपण मिरवतो, शेकडो लोकांची साथ आपल्याला आहे, हे दाखवत असतो, त्यातला एकही खांदा-मन निवडता येत सेल किंवा अगदी हाती घट्ट हात असणाऱ्यांना पकड सैलावल्याचं जाणवत नसेल? भावनांचा निचरा होऊ शकेल, असा एकही आधार वाटू नाही? मला जज करता जसं आहे तसं समजून घेणारा एकही भक्कम हात हातात आहे, असं वाटू नाही? मग गोतावळा म्हणजे काय? माणसांचं-दोस्तांचं-आपल्या लोकांचं कोंडाळ भोवती असणं म्हणजे काय? या सगळ्यांमध्ये असतानाही एकटं, त्याहीपेक्षा एकाकी होणं किती भयानक असेल? अस्वस्थता किती पोखरत असेल? आतून तुटलेपण येणं किती असह्य होत असेल?

रवा मानसिक आरोग्य दिन झाला. त्यानिमित्तानं सध्याचा ताणतणाव, स्पर्धा, मनाची विस्कटलेली घडी, चिंताचं काहूर, मग नात्याची गुंतागुंत अशा अनेक बाजूंचा सोशल मीडिया आणि इतर अनेक ठिकाणी ऊहापोह झाला. पण तो दिवस एकूणच निमित्त. लॉकडाउन, त्यामुळे निर्माण झालेला गुंता, बदलती परिस्थिती, करोना संकटाचा मानसिक सामना अशा अनेक बाजूंनी आज चिंता मोठी होत आहे. त्यामुळेच या काळात मानसिक आरोग्याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची आवश्यकता वाटू लागली.

अनन्या, आशुतोष, राधिका आणि अगदी सुशांतसिंग राजपूतसारख्या तरुण, रुढार्थानंयशस्वीअभिनेत्याच्या आत्महत्येनंतर मनात खळबळ उडाली. मग कुणी बॉलीवूडच्या राजकारणावर बोलू लागलं, कुणाला मानसिक आरोग्य हा विषय आजवर दुर्लक्षित राहिल्याची जाणीव झाली, कुणाला समस्त मित्रांना बोलण्यासाठी आपण उपलब्ध आहोत, हा विश्वास द्यावा वाटला, तर कुणाला हे पाऊल म्हणजे पळपुटेपणा सर्वांगानं चौफेर मतमतांतरं आदळत होती. बोललं जात होतं. पण तरीही काहीतरी राहतंय, एक धागा जो सुटतोय नि त्यामुळे सगळीच वीण उसवतेय असं वाटत राहिलं.

मानसिक आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीबाबत या क्षेत्राशी निगडित बऱ्याच जणांशी यानिमित्तानं बोलणंही झालं. मानसिक आरोग्यावर माझा अभ्यास नाही, त्यामुळे त्यावर अधिकारवाणीनं मी बोलू शकत नाही, पण या विषयातील कुतूहलानं मी सतत जाणून घेत असते, बोलत असते. त्यातून काही गोष्टी जाणवल्या. नैराश्य हा एक आजारच आहे, त्यावर बोलून मात करता येते, कुणाला बोलावं वाटलं तर मी आहे हे लक्षात ठेवा, माझ्याशी मन मोकळं करा असंसोशलमीडियावर मोकळेपणाने जो तो टाकतोय. त्यातील भावही खूप खरा, आतून आलेला वाटतो अनेकदा. पण मानसिक आरोग्य अणि आजार हे ताप येण्याइतके दृश्य कधीच नसतात. आपल्याला आजार झालाय, दुखतंय, उपचार घेण्याइतक्या वेदना बळावल्यात आणि उपचार घेऊनबरेहोऊ शकतो, हा विचारच संबंधित व्यक्तीच्या आतपर्यंत अनेकदा झिरपत नाही. वरवर सगळं उत्तम दाखवण्यासाठी जी जीवघेणी घालमेल होते, ती प्रत्येकजण सांगू, बोलू शकतंच नाही. आतून वाटू लागलं तरी ते समजून घेणारे भोवताली असतीलच असंही नाही. अशा परिस्थितीत आज जे मी आहे हे लक्षात ठेवा म्हणतात, त्यापैकी किती जण आपल्या अत्यंत जवळच्या एका तरी माणसाच्या मनातील ही घालमेल सांगता समजून घेऊ शकतात? आवाज-वागण्यातले बदल नोंदवू शकतात, आपण कुणाला इतकं जवळून ओळखू शकतो, ही बाबही महत्त्वाची वाटते. कारण मला नैराश्य आलंय, असं ताप आल्यासारखं कुणी सांगणार नसतं. मी, माझं या चौकटीबाहेर जाऊन आपण आपल्या जवळच्यांना किती जाणतो? जिवाला जीव देणारं माणूस हवं म्हणजे नेमकं काय, हे कधी उमगतं का आपल्याला?

ऑफिस, मित्रमंडळी, सोशल मीडिया, करिअरमुळे खुणावणारं विश्व अशा अनेक कंपूत आपण रमत असतो. तिथल्या प्रत्येकाचं एक दृश्य आणि अदृश्य जग असतं. समोर दिसतं त्यापेक्षा अनेकदा कितीतरी आतं असं ज्याचं त्याचं जग असतं. प्रत्येकाच्या स्वभावानुसार ते समोर येत असतं. अनेकदा सोशल मीडियाच्या आभासी म्हणाव्या अशा जगात आपलं यश, आनंद दाखवण्याचा अट्टहास इतका मोठा होतो की त्याचं नकळत दडपण आपल्या आयुष्यावर कधी येतं ते लक्षातच येत नाही. इतरांच्या वाट्याला सगळं इतकं उत्तम येत असताना माझंच आयुष्य असं का, ही तुलना मोठी होऊ लागते. त्याचा ताण दिसू लागतो.

महिलांच्या आयुष्यातील टप्पे आणि मनोवस्था यावर व्हिडीओ करताना डॉ. आनंद नाडकर्णी अगदी सहज म्हणाले.. बायकांचं बोलणं, गॉसिप, गप्पा याकडे लोक तुच्छतेनं बघतात अनेकदा.. पण या सगळ्यातून बाकी काही होत असेल नसेल, तिचं मन मोकळं होतं भडाभडा बोलून भावनांचा निचरा होतो. आनंद, दु:, संताप, वेदना खणखणीत व्यक्त होत असल्यानं पाटी कोरी होऊन नव्यासाठी जागा तयार होते. मनात आलं आता किती जणांना भावनांची अशी पाटी कोरी करणं जमतं? असा निचरा आपण करतो, होऊ देतो? मग गुंतागुंत वाढतच जाते. अनाहूत दडपण येत जातं. त्यातून निराशेची भावना घर करून राहते. अस्वस्थता मोठी होऊ लागते. त्यातून एखाद्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं वाटतं. या अगदी भावनांच्या कडेलोटाच्या क्षणी जरी दिलासा देणारा हात हातात आला, तरीही सारं काही परत येऊ शकतं, सावरलं जाऊ शकतं. पण तो आश्वासक हात मिळण्याची आणि हातात धरण्याच्या तयारी या दोन्ही बाजू कळीच्या ठरतात. तो मिळालेल्यांचं आणि त्याचं महत्त्व उमगलेल्यांचं आयुष्य नव्यानं उभं राहतं. इथेच मित्र, मैत्रीण, जवळचा कुणी म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी मोठी होत असते. आत्महत्येसारख्या घटनेनंतर बोलायला हवं होतं, कुणाला बोलावं वाटलं तर मी आहे वगैरे म्हणण्यापेक्षा जवळच्या एका तरी मनाची खळबळ ओळखू इतकं कुणाचं आपण होऊ शकू का, हा प्रश्न विचारू या स्वत:ला. बाकी मला नैराश्येने ग्रासलेलं, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली, वाईट मनोवस्थेतून गेलो हे आपल्यापैकी किती जण खुलेपणानं मान्य करतील, त्यांवर बोलतील? मानसिक दुखावलेपण आजही गूढतेच्या चक्रात आहे, यांवरही विचार करूया. त्याचवेळी स्वत:ला आणि दुखावलेल्या प्रत्येक मनाला सांगू या

थोड़ा सा रफू करके देखिये ना,

फिर से नयी सी लगेगी, ज़िन्दगी ही तो है