बुधवार, २० मे, २०२०

कोलाहलात साऱ्या माणूस शोधते मी


प्रिय,
एकच कुणी नाही, तर खूप खूप जण नावं तरी कुणाकुणाची घेणार? यादी इतकी लांबलचक होर्इल की मांडायचा मायना मनातच राहून जाईल. त्यामुळे कुणा एकाचा उल्लेख करण्याच्या चौकटीपल्याड जाऊन आयुष्यात, मनात, कामात, जगण्यात असलेले सगळेच म्हणू या

पत्रास कारण की,

सध्या आपण लॉकडाउनमध्ये आहोत नि पत्रलेखन हा कालबाह्य झालेला प्रकार अचानक पुन्हा जवळचा वाटू लागलाय. हरवलेलं काही शोधता, मांडता येईल का, भावनांना वाट मिळेल का या प्रयत्नांनी पत्राला पुन्हा जवळ आणलंय. हे पत्र लाल रंगाच्या पोस्टाच्या पेटीत जाऊन पडणार नाही, हे माहितीच आहे. पिवळ्या कार्डावर किंवा निळ्या आंतरदेशीय पत्रावरही कोरलेलं नाही. पण तरी ज्यांच्यापर्यंत ते पोहोचावं असं वाटतंय, त्यांना ते मिळेल, अशी हमी मनातून मिळतेय. शाळेत असताना १० गुणांसाठी पत्रलेखनाचा विषय असायचा. त्यातही व्यावहारिक आणि घरगुती असे काही प्रकार असायचे. एकतर चौकोनी मायना असणारे, नाहीतर भावनेच्या पार तळाशी जाऊन १०च्या १० गुण वसूल करण्याच्या हेतूनं डोळ्यात पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणारं. आजचं हे पत्र दोन्हीच्या मधलं. कुणाच्या तरी असण्याची कदर करणारं नि काहीतरी तूर्त निसटलंय याची खंत मांडणारं.
शाळा सुटली नि तंत्रज्ञानाच्या जगात पत्राशी संबंधही संपला. पण काही काळानंतर मला पत्र आणि त्यातून साधता येणारा संवाद हा प्रकार खूप आवडू लागला. मनातलं अगदी खोल असं काही आपण त्यातून मांडू शकतो, असं वाटत आलं. त्यामुळेच आई, बाबा, नवरा, जवळची मैत्रीण अशा अनेकांना मी आवर्जून पत्र लिहित आले. जगातील सर्वात उंचीवर असलेलं पोस्ट ऑफिस म्हणून ओळख असलेल्या स्पिती व्हॅलीतील हिक्कीमहूनही मी अशीच छानशी पत्र पाठवली होती. कधी नव्हे ते मी ही पत्र पोहोचण्याची वाट बघत होते. ज्यांना पाठवली, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकताही लागलेली. मी ट्रिपहून परत येऊन इतिवृत्त सांगून झाल्यानंतर ही पत्र पोहोचली. पण इतक्या उंचावर जाऊनही त्या क्षणी तिला आपली आठवण आली, ही ज्यांना पत्र मिळाली, त्यांची भावना सुखावणारी होती. त्यातल्या मायन्यापेक्षाही इतक्या लांब असतानाही आलेली आठवण ही भावना कितीतरी वरचढ होती. अशा बारीकशा गोष्टीतूनच तर आपापसातला कनेक्ट वाढत राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अनेक माणसं असतं ज्यांच्याशी रोज बोललं नाही, १५ दिवस बोललं नाही तरी जेव्हा संवाद होतो, तेव्हा तो कालच्या पुढे सुरू होतो. काहीही बदललेलं नसतं. पण १५ दिवसांनी, महिन्यानी आपली भेट होणार नि अखंड माणूस आपल्याला स्पर्शाच्या अंतरावर दिसणार, ही मनोमन खात्री असते. ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’, हे शाळेत कुठल्याशा इयत्तेत घोकलेलं वाक्य हे पत्र लिहिताना मनात घोळतंय. अनेकांशी ‘झूम’वरून, व्हिडीओ कॉल, स्काइप कॉल, अखंड फोनवरून बोलणं होतंय, व्हॉट्सअॅप चॅटला तर अंत नाहीये. घरात निवांत लोळत पडण्याची चैन करता येतेय. प्राइम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार दिमतीला उत्तम कंटेट घेऊन आहेत. वाचायला पुस्तकं आहेत. पण तरी आपलं असं काही हरवंतय, अंतरावर राहतंय असा भाव मनात खोल आहेच. गॅझेट आणि त्यातील कंटेट, व्हर्च्युअल संवादाचा सभोवताली कोलाहल असला तरी माणूस शोधावा लागतोय आज, अशी भावना आहेच. एरवी घरातून खाली उतरलं की वॉचमन, दुकानदार, रिक्षावाले, बसचालक, कंडक्टर, भाजीवाल्या, लोकलमधला नेहमीचा ग्रुप किंवा एकमेकींशी कुठलाच कनेक्ट नसलेल्या सहप्रवासी, आपल्याच वेगाने धावणारे प्लॅटफॉर्मवरचे लोक नि इच्छितस्थळी पोहोचल्यावर भेटणारी आपली माणसं. ही सगळी मंडळी आपल्या जगण्याचा भाग झालेली असतात. घरी राहणाऱ्या दोन-चार माणसांपलिकडे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, व्यावसायिक हितचिंतक, तज्ज्ञ अशी अनेक मंडळी आपल्या विस्तारित कुटुंबाच्या भाग असतात. अनेकांना कॉल केल्यावर एकदा भेटू या ग आता, असं म्हटलेलं असतं. पण तो एकदा जुळलेला नसतो. आई सतत फोनवर म्हणत असते, एक चक्कर मार गं. त्यावर पुढच्या आठवड्यात नक्की अशी आश्वासनं दिलेली असतात. पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या आठवड्यात नक्की जमवून भेट घेतलेली असते. तिथे पोहोचल्यावर अरे वा कधी आलीस असं अनेकांनी येता-जाता विचारलेलं असतं. सासूबाई काय काय तयार करून ठेवलंय, याची यादी सांगत असतात. भाची-पुतणीची मागण्यांची लांबलचक यादी असते. पण एकमेकांशी बांधून ठेवणाराच तर धागा असतो ना तो. जेव्हा भेटतो तेव्हा भावनांपासून वस्तूंपर्यंत सगळ्याची देवघेव होते. आज यातल्या कुणालाच भेटीच आश्वासनही देता येत नाहीये. एरवी घड्याळाच्या काट्यावर आयुष्य पळत असतं. नि अनेकदा इच्छा असून वेळ नसतो. आज हाताशी मुबलक वेळ आहे, पण तो आपल्या म्हणता येईल, अशा अनेकांना देताच येत नाहीये. हे कसलं अंतर म्हणावं? ऑफिसात पोहोचल्या पोहोचल्या आधी माझं ऐक असं म्हणत मैत्रिणींना, मित्रांना आपलं असं सक्तीनं काही ऐकायला लावता येत नाहीये, नि त्यांचे भावही टिपता येत नाहीत. तासनतास फोन सुरू आहेत, पण समोर उभं राहून अक्कल काढण्याची मजा त्यात नाहीये. कामाच्या डेडलाइनच्या वेळीच कम्प्युटरने असहकार केला, तर झालेल्या संतापात मार्ग काढायला इतर कुणी नाहीये. लॅपटॉपवर राग काढला तर उद्याचा दिवस कठीण होईल, ही जाणीवही स्वत:ची स्वत:लाच करून द्यावी लागतेय. आयुष्यात घडत असलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी, भावनांचा कल्लोळ शांत करण्यासाठी हक्काचा मित्रैत्रिणींचा खांदा, समोर बसवून आपण आळस तर करत नाहीये ना हे चाचपडणारी मंडळी सगळ्यांची उणीव जाणवतेय, अगदी रोज बोलणं होत असतानाही. हाडामासाचा माणूस समोर असणं नि त्याच्यासमोर भावनांचा निचरा करणं याचं समाधान वेगळंच असतं नाही?
परक्या प्रांतात गेल्यावरही मायेनं आपलीशी करणारी किती तरी नवी माणसं भेटत आली. लेहच्या ट्रिपमध्ये होम स्टेसाठी ज्यांच्याकडे राहिलो त्या आंटींच्या कुटुंबानं कडाक्याच्या थंडीत आपलेपणाची दिलेली ऊब, स्पितीच्या ट्रिपमध्ये माहिती देणारा आमचा चालक, तिथे शेवटच्या गावात रात्रीच्यावेळी लाइट नसताना आमच्यासाठी रांधणारी माऊली, बुलेटस्वारी करायला आलेला भन्नाट ग्रुप, नॉर्थ ईस्टच्या रस्त्यांवर काळजी घेणारा टोंडू, जंगल सफारीच्या निमित्तानं भेटलेली निसर्गवेड्यांची गँग, इंदोरच्या ट्रिपमध्ये कुमारजींच्या घरात भेटलेल्या उत्तरा, गोव्याच्या ट्रिपमध्ये आपलेपणानं घरी ठेवून घेणारे नि भटकताना सतत आमची खुशाली विचारणारे आदितीचे मामा-मामी असे किती तरी जण न कळत जोडले गेलेत. त्या त्या वेळी त्यांची झालेली भेट नि मदत किती मोलाची होती, हे सक्तीने घरी बसल्यावर कळतंय.
आशू तुला आठवतंय? डिसेंबरमध्ये आपण किती वर्षांनी असं समोरासमोर भेटलो. शाळेच्या दिवसांच्या गप्पांचा नुसता धबधबा पडत होता. व्हॉट्सअॅपवर रोज बोलत असतानाही किती काही सांगायचं राहूनच गेलेलं. दोन-तीन तास सभोवतालंचं सगळं विसरून बोलत होतो आपण. तो दिवस प्लॅन न करता ज्या दिशेने जाणार तिथे भेटू शकणाऱ्यांना फोन करायचे  नि भेटायचं असं ठरवलं. इतक्या जणांना थोडावेळ ना होईना पण भेटता आलं. एरवी ठरवून भेटू असं बोलण्यापुरतं राहिलेले अनेक जण भेटले जिची वेळ फक्त घरच्यांना नि तिच्या ड्युटी अवर्समध्ये असलेल्यांनाच मिळू शकते, अशी ज्ञानदा काहीही न ठरवता एक फोन केला नि त्यादिवशी भेटली. तिथून प्राजक्ता, तेजस्विनी, गायत्री गप्पा मारल्या. गॉसिप केलं. एकत्र नवं काय करू शकू यावर मंथन केलं. नि आपली वाट धरली. ठाण्यात गेल्यावर बाहेर यथेच्छ जेवूनही आदितीला कॉल केला नि ऑफिसला पोहोचायचंय, अजिबात फार वेळ नाही. वरण-भात नि नंतर चहा घ्यायला येतेय. तयार ठेव. असं सांगून दहा-पंधरा मिनिटांच्या भेटीत जे जे बोलायचं होतं, ते भसाभस बोलून टाकलं बॅग अडकवली नि निघालेही. अशी १०-१५ मिनिटांची आपल्या म्हणता येईल, अशा माणसांची भेटही ऊर्जा देते. एरवी यातल्या कुणाचसाठी आपल्याला खास असा वेळ नसतो. दहावेळा नियोजन नि पंधरावेळा आश्वासन देऊन आपण एकदा भेटतो. मनात आज नाही तर उद्या भेटू या हे समीकरण असतं. आज यथेच्छ वेळ असताना आयुष्याच्या भाग असलेली अगदी जवळची मंडळी कितीतरी लांब आहेत, वाटलं तरी भेटायला जाऊ शकत नाही, ही भावना हतबल करणारी आहे ना? परवा आई विचारत होती हा करोना जाणार कधी, नि तू येणार कधी गं? खूप महिने झालेत भेटून. एकदम अगतिक वाटून गेलं तिचं बोलणं. लगेच बॅग भरावी नि चालू पडावं, असं झालं. पण पायात बेड्या पडल्या.
संकट बाहेर घोंघावत असतानाही जिवावर उदार होऊन अनेकजण गाव गाठताहेत. आपल्या माणसांमध्ये काही करून पोहोचण्याचा आकांत करताहेत. वाट्टेल ती किंमत देताहेत. ते शहाणे, मुर्ख असं जजमेंटल होण्यापलिकडे आपल्या माणसांची ओढ किती मोठी असू शकते, हे सतत विचार करायला लावतंय. एका मैत्रिणीशी बोलताना ती सहज म्हणाली, संधी मिळाली तर मला गावी आईकडे जायला आवडेल. तिथे गच्चीवर गेलं की सभोवताली गप्पा मारता येतात, अख्खी गल्ली आपली असते. माणसांचे आवाज कानावर पडतात. इथे आता भकास वाटू लागलंय. आपणच निर्माण केलेल्या असंख्य गोष्टी सभोवताली असल्या तरी माणसं सभोवताली असणं, भेटणं, वावरणं याशिवाय काहीच आलबेल असू शकत नाही, ही जाणीव नव्यानं होऊ लागलीये. या माणसांचं भोवती असणं, चिडणं, रूसणं, संतापणं, प्रेम करणं, हक्क गाजवणंच तर आपल्यातल्या माणसाला जिवंत ठेवत असतं. आपल्यातील माणूस जगवायचा तर सभोवताली माणसांचा वावरही अपरिहार्य आहेच.
कुठल्याशा नात्यानं बांधलेल्या, मैत्रीच्या धाग्यात गुंफलेल्या, कुठल्याच नात्यात नसलेल्या अशा तुम्हा सगळ्यांच्या असण्यानं तर माझं माणूसपण अबाधित ठेवलंय. जगवलंय. माझ्यातील ‘माणसा’चा श्वास सुरू राहण्यासाठी आपल्याला भेटत राहायला हवंच, तेही स्पर्शाच्या अंतरावर येऊन. भेटू या लवकरच
तोपर्यंत मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद
लोभ आहेच, तो वाढावा
कळावे,
तुमचीच
यामिनी
ता. क. : सगळ्यांच्या निरोगी आयुष्याची कामना नि खूप प्रेम

रविवार, १० मे, २०२०

जगणं हिरावलं…!




करोनाच्या आपत्तीनं काय केलं? कुणाचं गाव तर कुणाचं घर दूर राहिलं, कुणाकुणातील माणूसपण हरवलं नि अनेकांचं जगणं हिरावलं. आजवर आधार वाटत आलेल्या मुंबईत एकेक दिवस ढकलणं कठीण होऊन बसलं, नि मिळेल त्या वाहनानं, नाहीतर चालत ते गावची वाट धरू लागले. करोनाच्या काळात इथेच रहा, प्रशासन तुमची व्यवस्था करेल, असं कितीही म्हटलं तरी गेल्या ५० दिवसांत या मंडळींची हातातोंडाची लढाईच सुरू आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. ‘गांव जा के राशन का चावल गेंहू तो मिलेगा. बाकी नही तो पानी के साथ खा लेंगे। यहाँ भूँखे मरनेसे तो सही है ना। आज बम्बई जिने भी नही दे रही और मरने भी’, श्रमिकांची ही भावना विचार करायला लावणारी आहे. संकट मोठं नि अनपेक्षित आहेच. पण त्यात माणसाचं जगणंच पणाला लागल्याची स्थिती आहे. ११००-१२०० किमी अंतर कुणी आनंदानं नाही तुडवतं, नि पर्याय असताना कुणी उगीच नाही रुळांवर झोपत!

मी मुंबईत आले तेव्हा वॉचमनला मुद्दाम सांगितलेलं, मला घरकामाला मराठी कुणी मिळालं तर बघ. वॉचमनने सांगितलं भाभी यहाँ पे मराठी नही मिलेगा. वो सब बडे घर मे काम करते है, वो भी दिन भर का.. आपको चाहिए तो बंगाली रखना पडेगा. त्यावेळी नुकतीच बंगालहून मुंबईला आलेली रूपा कामाला येऊ लागली. गेली १३ वर्ष ती माझ्याकडे काम करतेय. दीड वर्षानी एकदा महिना दोन महिने ती गावी जाते, तर माझ्यासाठी तो संकटकाळ असतो. मुलीचं लग्न, बाळंतपण, मुलांना नोकरी बघा, पॉलिसी कोणती काढू, त्याच्या हप्त्याचे पैसे पगारातून काढून ठेवा, अशा असंख्य गोष्टी सुरू असतात. ती अत्यंत व्यवहारी. नवऱ्याला न सांगता अनेक गोष्टी राखून ठेवायच्या म्हणून माझ्या घराच्या कप्प्यात तिचं बँकेचं पासबुक साठवलेले पैसे काहीबाही असतं. पैसे साठले की स्लिप भरून नेते आणि आईला गावी पाठवते. परवा ती घरी आली. दिदी यहाँ पे गरीबों को राशन दिया जा रहा है, तो पूँछते है मराठी है क्या? मेरे बगल में रहनेवाले सबको मिला, हमे नही। यहाँ पे राशनकार्ड भी नही चलता, गाँव का है तो. मराठी को दे सकते है तो हमें क्यूँ नही? हम क्या भूँखे मर जाए? गावी जाण्यासाठी तिने अर्ज केलाय. हज्जारदा तिला बजावतेय, रेल्वेनेच जायचं. पण संयम राखणं कठीण होत चाललंय त्यांच्यासाठीही. दुपारी फोन केला नि म्हणाली वो ममता हमें गाव जाने देगी ना? गाँव के सब बोल रहे है की आने नही देंगे क्या करे दिदी, जान तो हमारीही जाएगी.. दोनो तरफसे!

इस्त्रीवाला भैया परवा लगबगीनं आला. महिन्याचे पैसे नि थोडे जास्तीचे मिळतील का विचारलं? खोदून विचारलं तरी कारण नाही सांगितलं. मला वाटलं सध्या काम नाही, तर धान्यासाठी असणार. आज फोन केला तर दुकान बंद करके गाँव जा रहा हूँ म्हणाला. एकदा सांगितलं असतं तर आपण बघितलं असतं ना काही, असं म्हटलं तर उत्तर होतं सरकार की तरफ सें गरीबों के लिए कुछ नही होगा भाभी हम बहोत लोग जा रहे एक ट्रक से। मुंबई में रहना मुश्कील हो गया था भाभी.. दुकान का रेंट, खाने का इंतजाम कैसे करते? ये कब खत्म होगा ये भी पता नही.. दो महिने में किसीने राशन नही दिया.. यूपीलाच राहणारा वॉचमन असाच रात्री निघून गेलाय नि आता अनेक सोसायट्यांत पाणी कोण टाकीत चढवणार इथून प्रश्न आहे.

परराज्यातून पोटापाण्यासाठी आलेली ही मंडळी. मिळेल ते काम करत मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याचा अर्ध्याहून अधिक वाटा ते उचलताहेत. आज त्यांची अस्वस्थता वाढतेच आहे. पण आपल्याच राज्याच्या कुठल्याशा भागातून आलेली मंडळीही आता अस्वस्थ होऊ लागली आहेत.

पाम बीचच्या सिग्नलजवळ एक आजीआजोबा सावलीला बसलेले. कुठून आलात, नि जायचंय कुठे विचारलं तर लॉकडाउनआधी उपचारासाठी ते मुंबईत आले होते. कर्नाटक सीमेवर त्यांचं गाव आहे, असं त्यांनी सांगितलं. लॉकडाउनपासून कुठल्या शिबिरात, छावणीत राहिले. मग चालत नवी मुंबईपर्यंत आले नि आता त्यांना कुठलासा टेम्पो गावी नेणार आहे. सीमेवरून आलेल्या दुधाच्या गाडीतून ते जाणार होते. कुणी त्यांना बिस्किटे दिली कुणी आणि काही. आम्ही कुणाकडं मागून खाल्लं नाही ग पोरी आजवर. मुंबईत कुणी नाही आमचं. आलो नि फसलो. पण काय वेळ आलीये बघ आमच्यावर, असं ते म्हणत होते.

चार घरी स्वयंपाक करणाऱ्या ताई सकाळी भाजी विकताना दिसल्या. काय चाललंय इतकंच विचारलं तर अस्वस्थ झाल्या. त्यांचा नवरा ड्रायव्हरचं काम करतो. मालकानं एक महिन्याचा पगार दिला, पण पुढचे महिने कसे काढणार? यांची स्वयंपाकाची कामं थांबलेली. भाजी विकून पैसे मिळवावे म्हटलं. मालकानं सकाळीच भाजी आणली नि मी विकायला घेऊन आले. पश्चिम महाराष्ट्रातून येऊन इथे राहत असलेल्यांपैकी या एक. अशा अनेकजणी रांगेत भाजी, फळं, दूध विकत होत्या. पण रस्त्यावर बसून सामान विकताहेत म्हणून पोलिसांनी माल जप्त केला. ताई २५०० चा माल गेला.. कांदे बटाटे नि टोमॅटो नाही नेले. म्हणजे ते विकून चालणार? कामच नाही तरी जगायचा प्रयत्न करतो तर असा त्रास. आता काय करू बाय बोल? त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर आज कुणाकडे आहे?

माझ्या घराच्या मागच्या सोसायटीत एका रिक्षाचालक राहतो. सांगलीच्या जवळचं कुठलं तरी गाव. मी ऑफिसला निघायच्या वेळी रोज तो भेटायचा नि मला स्टेशन सोडायचा. त्याच्या मुलांच्या क्लासची ती वेळ. त्यामुळे रिक्षात मुलं असायची. त्यांना क्लासला सोडून पुढे मला स्टेशन सोडायचा. मुलांनी शिकावं म्हणून प्रचंड कष्ट करतो. हवं ते देतो. शाळांची प्रगती सांगतो. काही नोट लिहून आली तर दाखवतो, विचारतो. परवा त्यांच्या घरातून प्रचंड भांडणाचे आवाज येऊ लागले. नंतर बायकोचा रडण्याचा आवाज. हा प्रचंड संतापून हात उगारत होता. घरातल्या भांडणात सहसा भाग नाही घ्यायचा, म्हटलं तर ती बाई कळवळून ओरडत होती. (याचा पूर्वानुभव भयानक आहे) म्हणून मी बाल्कनीतून आवाज दिला नि हात उगारू नको, पोलिसांना बोलवावं लागेल म्हटलं. तो संतापात खाली निघून गेला. संध्याकाळी बायकोनं आवाज दिला नि म्हणाली ताई हाताला काम नाही ना त्यांच्या. घरात पैसा नाही. गावी जाता येत नाही. तिकडे जाऊनही करणार काय? खूप अस्वस्थ आहेत. नाहीतर हात नाही उचलत कधी ते नंतर तो खाली भेटल्यावर त्यालाही हात नाही उगारायचा हे बजावलं.. पण अस्वस्थता, चिंता वाढतेय हे वास्तव कसं नाकारणार?

भाजी विकणाऱ्या मावशी, छोटे दुकानदार, स्वयंपाक करणाऱ्या काकू, कडधान्य विकणाऱ्या, नारळ-फळ विकणाऱ्या, पालेभाज्या निवडून देणाऱ्या अशा अनेक छोट्या छोट्या लोकांचं जगणं अशक्य झालंय आता. लॉकडाउन संपला तरी लगेच हाताला काम मिळेल याची आणि नाहीच संपला तर त्यांना जगण्याची शाश्वती नाही. एकेक दिवस त्यांना मोठा वाटू लागला आहे. संकटानं आपलं-परकं बघून वार नाही केलेत. अनेकांसाठी आज आभाळ फाटलंय नि ठिगळं लावणं त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मग प्रशासन, सरकार, विरोध पक्ष सगळ्यांनीच माणूस म्हणून आधार द्यायला हवाय. त्यासाठी तातडीने पावलं टाकायला हवी. राजकारण बाजूला ठेवून पायीच गावी जाणाऱ्या जत्थ्यांना थांबवत दिलासा द्यायला हवा. वाहतुकीची सोय वेगानं करावी. संकट गंभीर आहेच, पण रोगापासून वाचताना उपासमारीनं कुणाचं जगणं हिरावणार नाही, इतकी काळजी घ्यायला हवी. व्यक्ती, समाजाचा भाग म्हणून आपणही आपला खारीचा वाटा उचलायला हवाच.


शनिवार, ९ मे, २०२०

नीले गगन के तले…!


निळाशार अथांग समुद्र, डोक्यावर निरभ्र आकाश, किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटा नि, उसळणाऱ्या पाण्याचा लयबद्ध आवाज. अशातच अचानक आकाशात तांबूस, सोनेरी किरणे दिसू लागतात. तांबडं फुटतं नि नव्या कोऱ्या दिवसाची चाहूल लागते. किनाऱ्यावर थडकणारे हे पाणी कापत, त्यातून आपली वाट काढत लांबवर लाटांचा आवाज ऐकत चालणं, नि दिवसाची चाहूल घेत नवी स्वप्न रंगवणं म्हणजे स्वर्गसुख. इतर कुठलेच आवाज न ऐकता फक्त लाटांच्या आवाजावर लक्ष दिलं तर एक छानशी लय सापडते. खोलवर समुद्रातून उसळी घेत पाणी किनारा गाठण्याचा प्रयत्न करत असतं. सोसाट्याच्या वाऱ्यानं कधी दिशा भरकटते, कधी अर्ध्या प्रवासातच लाट विरून जाते. पण उसळी घेतल्यानंतर निग्रहाने, हवेच्या वेगाशी जुळवून घेत, आव्हानं परतवत काही लाटा त्यांचा किनारा गाठतातच. प्रत्येक लाटेला हे साधत नसलं तरी उसळी घेण्याचा धर्म समुद्र नि पाणी सोडत नाही. किनारा मिळाला नाही, म्हणून सुरुवात-प्रवासच व्यर्थ होता असंही नाही. कुठे तरी पोहोचण्यासाठी केलेली सुरुवात, नि प्रयत्न काही तरी तर शिकवून जातातच.
मला या समुद्राचं प्रचंड आकर्षण वाटत आलंय. त्याची विशालता अचंबित करते. समुद्राचा तळ न लागणं, भरती-ओहोटीच्या तालावर ‘उसळी’ निश्चित करणं, काही तरी खूप आतपर्यंत ओढून नेणं नि काही बाहेर सोडून येणं सारंच खूप जवळचं नि आपल्याशी जोडलेलं वाटत आलंय. ठराविक लयीनं समुद्रावर लाटा थडकत असताना अधिकाधिक पुढे जाण्याचा मोह होतच असतो. पायाखालची वाळू सरकत असते, नि आणखी पुढे पाऊल टाकून आपण नव्या वाळूवर पाय ठेवतो. तीही सरकू लागते, मग आणखी पुढचं पाऊल. अचानक एक मोठी लाट उसळून येते नि पाणी गळ्यापर्यंत लागून आपण घाईघाईनं बाहेरची वाट शोधतो. परतताना वाळू अधिकच सरकतेय, असं वाटतं. तरी किनारा गाठण्याचं बळ आपणही पाण्यासारखंच गोळा करतो. किनाऱ्यावर आलं की काही क्षणानंतर पाण्याच्या उसळी मारण्याचं, वेगाचं नि सरकणाऱ्या वाळूचं आश्चर्यच वाटू लागतं. कारण समुद्राच्या लाटा पुन्हा लयीत उसळत असतात, वाळू त्याच लयीशी जुळवून घेत वाहत असते, नि सारं काही शांत असते. क्षणापूर्वीच्या उसळीचा आता मागमूसही दिसत नसतो. किती विलक्षण चक्र आहे ना हे समुद्र, पाणी, लाटा, वाळू नि वाऱ्याचं. आपलं जगणंही असंच एका लयीत सुरू असतं. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते. यानंतर हे करायचं, इथे जायचं, ही वेळ कशाचीये, सगळं आपण आखलेलं असतं. पण अचानक एखादी लाट उसळते, वाळू सरकू लागते. अवलंबून असलेल्यातलं काही बिनसतं नि पुन्हा सगळं जुळवत नव्यानं सुरुवात करावी लागते. पण उसळी मारण्याचा काळ नि विस्कटलेलं सांधण्याचा अवधी सावरता आला की किनारा दिसू लागतोच ना? पण त्यासाठीच बळ नि इच्छाशक्ती गोळा करता यायला हवी. हे साधणं सोपं असतं?

कुलदेवतेच्या दर्शनाच्या निमित्ताने आम्ही लहानपणी खूपदा गोव्याला जायचो. मंदिरात जाणार यापेक्षाही आपण समुद्रावर जाणार याचा कोण आनंद व्हायचा मला. अख्खा दिवस आम्ही पाण्याभोवती काढायचो. भर दुपारच्या टळटळीत उन्हात आईबाबा त्यातल्या त्यात सावली शोधून लांब न्यायचे. पण तितकंच. नाही तर मी अखंड पाण्याशी असायचे. समुद्राच्या वाळूत किल्ला करायचे. एका लाटेनं अर्धा उभा राहिलेला किल्ला वाहून जायचा. मी खट्टू व्हायचे. मग बाबा यायचे. अरे अर्धाच तर झाला होता, पुन्हा बांधू या म्हणत ते स्वत: वाळूत हात घालून माझ्या बांधणीच्या स्वप्नाला आकार द्यायचे. मला लय सापडलीये, हे कळलं की हळूच बाजूला व्हायचे. किल्ला पूर्ण झाला की निरखताना कोण आनंद व्हायचा. चिकाटी सोडली नाही, याचा आनंद बाबांच्या चेहऱ्यावरही दिसायचा. किती छोट्या गोष्टीतून टिकून राहण्याचे धडे आपल्याला मिळतात नाही?
शाळेतली महत्त्वाची वर्ष, मग कॉलेज, स्वप्नांचा पाठलाग यात समुद्र मागे पडला. कुलदेवतेच्या दर्शनालाही आता आईबाबाच जात होते. पण करिअरच्या निमित्ताने मुंबई गाठली. समुद्र नव्या रूपात भेटला. गोव्यासारखे स्वच्छ किनारे नि किल्ले बांधण्याची चैन इथे केली नसली तरी मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर बसून अस्ताला जाणारा सूर्य, लाटांचा आवाज ऐकणं, हे कमालीच सुख वाटतं. बाजूने गाड्या त्यांच्या वेगाने धावत असतात. कुणाला वेळ गाठायची असते, कुणाला लोकल पकडायची असते. पण आपण त्या जगाचा भागच नसतो. आपल्या कानावर फक्त समुद्राच्या लाटांची उसळी, स्थिरावणं पडत असतं नि आकाशात भडक रंग विरून सूर्य अस्ताला जात असतो. हे सारं पुन्हा पुन्हा नव्याने अनुभवायला फार आवडतं. सूर्य अस्ताला जात असतानाच्या कातरवेळची हुरहूर जाणवू लागते. त्याचवेळी घड्याळ वेळ दाखवत परतीचा इशारा करत असतं. गेले कित्येक वर्ष दिवसाच्या सगळ्या वेळांचा समुद्र मी अनुभवला. मुद्दाम जाऊन त्या त्या वेळचे बदल पाहिले. ऐकले! काळ-वेळ नि परिस्थितीशी जळवून घेणं, समरसून जाणं, तो आपल्याला वारंवार शिकवत असतो. आपल्याला ते किती घेता येतं नि अंमलात आणता येतं हा प्रश्न असतो. जुळवून घेणं, समरसून जाणं निश्चितच सहजसाध्य नसतं.

डिसेंबर महिन्यात कुठे तरी जायचं असं मी नि मैत्रीण ठरवत होतो. तारीख ठरलेली, पण ठिकाण ठरेना. गूगलवर अर्धा देश फिरून नि स्वप्नांत त्या ठिकाणांवर पोहोचून नियोजनाच्या पातळीवर पुन्हा नेटवरच परतत होतो. अखेर यावेळी ठरलं नाहीये तर गोवाच जाऊया असं म्हटलं नि मडगाव गाठलं. तिचा पिंड पक्षी, निसर्ग निरीक्षणाचा. माझी ओढ समुद्राकडे. मग आम्ही दिवस विभागले नि नेत्रावळी अभयारण्य गाठलं. तिच्याबरोबर फिरताना जंगलाचा आवाज ऐकायला खूप आवडतो. ठराविक वेगानं वाहणारे वारे, पानांची लयबद्ध सळसळ, पक्ष्यांचे आवाज, एकमेकांना खुणावणं नि आकाशात विहार करणं हे सगळं नोंदवणं खूप छान असतं. अनेक पक्ष्यांची ओळख झाली. जे पुन्हा पुन्हा भेटले ते लक्षात राहिले. ती मात्र नेटानं नव्यांशी ओळख करून देत राहिली. रंग, रूप, आकार, चोच, शेपटी, आवाज, त्यांचा कानोसा असे बारकावे सांगत राहिली. मी ही मनापासून समजून घेत राहिले. विस्तीर्ण जंगलामध्ये किर्रर्र शांतता नि दोघींचं काही तरी न्याहाळत चालणं.. हा अनुभवच भारी. जंगलाची शांतता, तिथलं वैभव आणि मुख्य जंगलाचा आवाज मनात साठवत आम्ही समुद्र गाठला. जुन्या आनंदाशी नव्याने भेट झाल्यासारखं वाटलं.
आम्ही निघाल्यापासून मी तिला सांगत होते, सूर्य उगवताना किंवा अस्ताला जातानाची वेळ आणि किनाऱ्यावर थडकणाऱ्या लाटा कापत, त्यांची लय ऐकत मला दूरवर चालत जायचंय. खूप दिवस हे मनाशी ठरवून आहे. स्वच्छ आकाश निरखायचंय, पाण्याचं उसळी मारणं अनुभवायचंय. वाळू सरकताना तोल सावरायचाय नि खोल आत चालत जाऊन वेगानं पुन्हा किनारा गाठायचाय. माझं सारंच ठरलेलं. मला काय करायचंय, हवंय हे मला माहित होतं. त्यामुळे किनाऱ्यावर उभं राहून दुरून निरखण्याची भूमिका तिच्याकडे आली. अस्ताला जाणारा सूर्य पाहिल्यानंतर उगवतीची ओढ लागली होती. पहाटेच पुन्हा किनारा गाठला. तांबडं फुटलं नि हायसं वाटू लागलं. काही तरी जसं डोळ्यादेखत संपलं होतं, तसंच नवं काही सुरू होणंही अनुभवता आल्याचा आनंद होता. त्याचवेळी लाटांची गाज कानात साठवत दूरवर पाणी कापत चालत होते. मला जे जे करायचं होतं, ते ते मी करू शकले याचा आनंद मनात नि चेहऱ्यावर दिसत होता. थोडा वेळानं समुद्राचं उसळणं शांत झालं नि लाटांचा वेळ मंदावला. पाणी आत ओढलं जाऊ लागलं. पाण्याची ओढ आपल्यालाही खेचत असल्याची जाणीव झाली नि तोल सावरून आता बाहेर पडायचं, अशी वर्दी मिळाली. तो क्षण कायम महत्त्वाचा वाटत आलाय. बाहेर पडण्याची ती वेळ साधता आली की आपलं गणित चुकत नाही नि गोळबेरीज करून उत्तर बरोबर आणण्याचा आटापिटाही करावा लागत नाही. पण अनेकदा ही वेळच चुकते, नि बाहेर पडून नव्या सुरुवातीचीही संधी हुकते. शांततेचा थोडा काळ तग धरला नि संयम ठेवला की लाट, पाणी, समुद्र नि आयुष्य पुन्हा उसळी घेणारंच असतं. माझ्यापुरती अनेक गणितांची उकल करत, उगवत्या सूर्याबरोबर नव्या स्वप्नांची जुळवणी करत, काही जुनी स्वप्ने नव्याने पाहत मी परतीच्या गाडीचा वेग धरला!!!
आपल्यालाही आता स्वप्नांची नव्यानं आखणी करायचीये. पूर्वीचे ठोकताळे कदाचित जसेच्या तसे आता लागू होणार नाहीत. त्यात बदल करावा लागेल. शांततेचा काळ तग धरल्यानंतर आपलं आयुष्यही पुन्हा उसळी घेणारंच आहे.

रविवार, ३ मे, २०२०

सुगंधी प्रवास


 

सकाळची वेळ. अगदी सूर्योदय वगैरे नाही. पण तरी माझ्यासाठी लवकरचीच. हॉलची खिडकी उघडली नि सुगंध भरून गेला. आज बाल्कनीतल्या माझ्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये आनंदाचा सुगंध दरवळत होता. साधारण दीड वर्षापूर्वी तळेगावहून बसमधून काय चिखल आहे, अशा लोकांच्या शिव्या खात अनंताचं झाड माझ्या मठीत घेऊन आले. त्याच्या आधी गेले तेव्हा सोनचाफा असाच आणला होता. तिसऱ्या फेरीत कृष्णकमळ दाखल झालं होतं. हे तीनही प्रवास माझ्यासाठी सुगंधी स्वप्न होते, जे मी नव्या मातीत रुजवणार होते. रोज इमाने इतबारे पाणी, कुणी सांगितलं म्हणून झाडांची संगीत थेरपी, कुणी सांगितलं म्हणून गप्पा, कांद्याचं पाणी, असे सारे काही मनापासून केले नि त्याचा ‘बंपर’ आनंद मला मिळाला. मंद पण स्वत:चे अस्तित्व दाखवणारा अनंताचा वास, थोडासा उग्र पण कुठूनही ओळखता येणारा सोनचाफा, नि या दोघांपुढे सुगंधाने कमी असलेले पण रूपाने नि वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबर जाणवणारे कृष्णकमळाचे देखणे अस्तित्व. आज सारा आनंद एकत्रित माझ्या वाट्याला आला होता. एरवीही सदाफुली, मोगरा, झेंडू, शेवंती फुलत असते. त्यांचीही निगुतीने काळजी घेत असते. पण अनंत, सोनचाफा नि कृष्णकमळाला माझ्या आठवणी नि मातीतील प्रेमाचा सुगंध होता. त्यामुळे त्यांचं फुलणंही माझ्यासाखी खास होतं. 
चार-बाराच्या शिफ्टमध्ये काम करताना माझी सकाळ कधीच लवकर होत नाही. आईच्या भाषेत सांगायचं तर सूर्य साधारण अर्धा डोक्यावर येतो तेव्हा मी उठते. त्यामुळे दारातील फुलांचाही अर्धा दिवस उमलून नि सुगंधाची पखरण करून झालेला असतो. त्यानंतर रोजची कामं, आवराआवर, काही वाचणं-ऐकणं-पाहणं, मेसेज, फोन नि त्यानंतर ऑफससाठी बाहेर पडणं या सगळ्यातच तो सुगंध नि त्यांचं अस्तित्व मागे पडतं. पण लॉकडाउननं या सगळ्याची खास जाणीव करून दिली. सकाळी लवकरच उठून चहाचा कप हातात घेत बाल्कनीत कितीतरी काळ या फुलांचं फुलणं निरखत होते. अनंताच्या पाकळ्या एकेक करत फुलत होत्या नि फूल आकाराने मोठे नि देखणे होत होते. हे सगळं मी बघत होते, नोंदवत होते. तिन्ही सुगंधांचं मिश्रण जाणवत होतं. त्याचे फोटो मैत्रिणीला पाठवले तर तिने पाठवलेली प्रतिक्रया खूपच पटली. भावली. लॉकडाउनमुळे हा होईना पण हे अनुभवायला तू घरी आहेस, सुगंध तू ‘फिल’ करू शकतेय. एरवी ही फुले फुलली असती, एकटीच डवरली असती नि सुगंध हवेत विरूनही गेला असता. खरंच आहे ना?

उद्याच्या जगण्याच्या तयारीत, अस्तित्व शोधण्याच्या प्रयत्नांत, स्पर्धेच्या लढाईत आपला आजचा दिवस नि त्यातला आनंद, जगणं ‘फिल’ करायचं राहतंय का? जो दिवस आलाच नाहीये, त्याच्या तयारीसाठी आजचा आनंद नजरेआड होतोय का? म्हणजे उद्याचा कानोसा घ्यायचाच नाही? तयारी करायचीच नाही? ती तर करावीच लागते. झाडं, वेली पण आधी मोठे होतात, फांद्या पसरतात, कळ्या धरतात नि मग उमलण्याचा क्षणिक आनंद मिळतो. त्यानंतर फूल सुकतं, पाकळ्या गळून पडतात, कधी फूल तोडलं जातं, नि झाडाला पुन्हा नव्याने उमलण्याची आस लागते. आपल्यालाही असं आधी फुलण्याचा आनंद अनुभवणं नि मग नव्यानं फुलण्याची तयारी करणं जमेल?
माझ्या दारात असाच मी मरवा लावलेला. त्याचा वेल मस्त चढायला लागला. छोटी छाटी चांदणफुलं फुलायला लागली. अख्खावेल शुभ्र फुलांनी नि मंद सुगंधानं भरून गेला. मैत्रीण वारंवार सांगत होती. लक्ष ठेव. त्यात बीज तयार होतं. ते पुन्हा रुजवावं लागतं. पण बहरलेल्या वेलाच्या आनंदात मी नंतर बघू म्हणत, बीज शोधलंच नाही. कालांतरानं त्या वेलाचं जगणं संपलं नि नव्याने रुजवणंही राहून गेलं. वेगळीच हुरहूर जाणवली. एखादी गोष्ट त्याच वेळेत नाही केली, तर पुढे उमलणारं छान काही गमावू शकतो, याची जाणीव तीव्रतेनं झाली. गोष्टी करायच्याच असतात पण त्याची वेळ साधता येणं किती महत्त्वाचं असतं ना?
फुलांचं नि माझं नातं खूप लहानपणापासून. छोट्या शहरात राहत असल्यानं अंगण नि दारात फुलं हे ओघानंच आलं. अगदी अंगण शेणानं सारवण्यापासून सारा अनुभव घेतलेला. आमच्या दारात मोगरा, गावठी गुलाब, कुंद, अबोली, जास्वंद अशी फुलं होती. नि मागच्या दारात भोंडे आजीचं मोठी बाग. पांचळ काकूंकडे निळ्या कृष्णकमळाचा वेल. झाडं रुजली त्यांच्या अंगणात असली, तरी अर्ध्याहून अधिक ती आमच्या दारात फुलायची. माझी आजी रोज संध्याकाळी उमलायला आलेली फुलं तोडून माझ्यासाठी गजरा करायची. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना आठवण करायची. रोज केसावर गजरा माळून मी शाळेत जायचे. खूपदा मैत्रिणी हसायच्याही. पण गजरा माझ्या गणवेशाचा नि जगण्याचा भाग होता. कधी कधी वेणीपेक्षा गजरा मोठा होऊन मी बावळटही दिसायचे. आता हसूही येतं. पण तेव्हा मला फरकच पडत नव्हता. आजीने केलाय नि मला तो आवडतोय, इतकं पुरेसं होतं. किती छोटीशी गोष्ट किती मोठं समाधान देते. जगणं सुंदर करत असते, नकळतच. मोगऱ्याचा प्रसन्न गंध नि त्याला अबोलीची शांत साथ. किती छान वाटायचं तो आजीनं प्रेमान नि ठराविक अंतरानं गुंफलेला गजरा माळताना. आजही तळेगावला गेलं की आजी जवळ बसवून विचारते तुला आठवतंय का गं, मी रोज आपल्या दारातली आणि तिथे नसेल तर बकरे काकू, कऱ्हाडकर मामी, जोशी काकू नाहीतर भोंडे आजी, ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडून फुलं आणून गजरा करायचेच.. हे मला आठवत असावं नि मी प्रेमानं तिच्याकडे बघावं, इतकी छोटी अपेक्षा आजही तिच्या डोळ्यात दिसते. नि आम्ही सुगंधी आठवणीत काही काळ तरी रमतोच. आजी तू माझ्या वाट्याला किती सुगंधी जगणं दिलंय, याची जाणीव मला आहे गं. पण हे मी तिला का नाही सांगत?
भोंडे आजींच्या दारात अनंत पहिल्यांदा मला भेटला. ते झाड मोठं नि प्रचंड फुलणारं होतं. त्यामुळे अख्ख्या चाळीभर त्याचा घमघमाट पसरायचा. त्या सुगंधाशी एक वेगळीच, जुनी ओळख तयार झाली. मुंबईतील दोन फरश्यांच्या बाल्कनीत उमललेल्या अनंताच्या सुगंधात माझी माझ्या या आठवणींची भेट झाली. माझ्या शाळेच्या रस्त्यावर वडाची दाट सावली असायची नि या दोन वडाच्या झाडांमध्ये बुचाचं (त्याचं खरं नाव, किंवा सायंटटिफिक नाव नाही माहित) झाड उंच वाढलेलं असायचं. शाळेतून परतताना सायकल थांबवून मी ती फुलं गोळा करायचे. त्याचे लांब देठ एकमेकांमध्ये गुंफून वेणी तयार करायचे, नि घरी येऊन आईसाठी ठेवून द्यायचे. आई संध्याकाळी साडेसहा-सातला येईपर्यंत ती वेणीही सुकायची नि वीणही सैल व्हायची. शनिवारी मी शाळेतून घरी यायचे, तेव्हा आई आधीच घरी आलेली असायची नि फुलांची वेणी सुकण्याआधी आईला देता यायची. इतका आनंदाचा क्षण असायचा तो. खूप काही मिळवल्याचा. किती छोट्या गोष्टींतून आण निरपेक्ष समाधान मिळवू शकतो, खरं. कळतं पण वळत का नाही?
आमच्या चाळीत कुठूनसं एक ब्रह्मकमळाचे झाड आलं. एकेक करत ते प्रत्येकाच्या दारात रुजलं. या फुलांचा काळ अवघा दोन तासांचा असतो. ते दोन तास मंतरलेले वाटावे इतके कमाल असतात. त्या कमळाचं हळूहळू फुलत जाणं नि देखणं रूप संमोहित करायचं. ज्या घरात या फुलण्याची चाहूल लागे, तिथे आम्ही तो क्षण अनुभवण्यासाठी गोळा होत असू. फुलाचा उमलण्याचा क्षणिक काळ संपला तरी त्याच्या आनंदाच्या गप्पा उत्तररात्रीपर्यंत रंगायच्या. कॉफीचे कप रिकामे करत, हसत खिदळत सुगंधी आठवणींची ठेव घेऊन जो तो आपल्या घरी परतायचा. पुन्हा नव्या फुलण्याची आस घेऊन!!!
कॉलेज, नोकरी, करिअर या सगळ्यात मग सुगंधी आठवणींचा प्रवास मनात कुठेतरी खोलवर गेला. आठवण होणार नाही इतका. कधी तुळशीबागेत, कधी लोकलमध्ये मोगऱ्याचे गजरे दिसायचे. पण तितकंच. मुंबईत दोन फरश्यांच्या बाल्कनीत कुठली झाडं रुजणार नि बहरणार, हा विचार करत त्या वाटेलाही गेले नाही. पण आयुष्याचं जेव्हा रुटीन होऊ लागतं तेव्हा खोलवर रुजलेल्या अशा आठवणींचा सुगंध नव्यानं जाणवू लागतो. खुणावू लागतो. एक दिवस अचानक चार कुंड्या, माती नि रोपं स्कुटीवरून घरी आणली. न पेलवणारं ओझं दारापर्यंत आणलं. रोपं रुजवली पण मूळं धरेनात. कधी करपायची. कधी उंदिराच्या तावडीत सापडायची नि उत्साहाची माती व्हायची. पण मीही नेटानं नवं काही रुजवत राहिले. मधल्या काळात टोमॅटो, वांगी, मिरच्या अशा बऱ्याच भाज्या इथे ‘पिकल्या’. गंमतीने सासरे मला म्हणालेही इतकीच शेती आवडते तर गावी चल, नाही तर कामाला मिळंत कुठे कोण हल्ली? पण माझ्यासाठी या दोन फरश्यांच्या माझ्या विश्वात मी खूश होते. पण एकेक करत उंदराची नजर पडतच राहिली नि भाज्यांचा नाद सोडून सुगंधी पावले टाकली. कुठे थांबायचं नि नवी सुरुवात कशी करायची हे उमगंल की जगण मस्त होत नाही?
खूप आनंदात, कधी निराशेत, कधी वेदनेत, हरल्यावर, कधी काळजीत, समाधानात आणि जिंकल्यावरही मला घराचा हा कोपरा कायम खुणावत राहतो. सदाफुलीची सतत फुलण्याची सवय सकारात्मकता देऊन जाते. कॉफीचा कप, छानसं पुस्तक, आवडंत गाणं नि माझा हा कोपरा म्हणजे सर्वोच्च सुख वाटतं. एकांतात जिवाचे सारे आकांत इथे निमतात. नव्यानं सुरुवात करण्याची उर्मी देतात. आपल्याकडे असलेल्याच गोष्टींकडे नव्याने पहायला सांगतात. फूल फुलतं, त्याचा काळ संपला की गळून पडतं, पण झाड नव्यानं फुलण्याची उर्मी सोडत नाही. बहरत राहतं. डवरत राहतं, जगण्याची चिकाटी शिकवत राहतं. ऊन, वारा, पावसाच्या लहरीत हिंकाळतं, पाण्याअभावी मलूल होतं, पण संजीवनी मिळाली की जुनं विसरून पुन्हा सुरुवात करतं. थोडा काळ जावा लागतो. पण झाड पुन्हा बहरणारंच असतं. फुलणारंच असतं नि त्यांच्या अस्तित्वानं आपला प्रवास सुगंधी करणारंच असतं.
आज आपण सगळेच थांबलोय. मलूल झालोय. फुलण्याबाबत संभ्रम आहे. पण झाडाकडून चिकाटी नि हिरवं राहणं घ्यायचंय आपल्याला नि आनंदाची बाग बहरण्यासाठी मशागत करायचीये



शुक्रवार, १ मे, २०२०

आजींचे उबदार स्पर्श


मी नि आदिती पुन्हा एकदा आनंदनगरला गेलो. कोथरूडचं आनंदनगर नि आमच्या आठवणींचं माहेरघर. जवळपास १० वर्षांनी. आनंदनगरचे रस्ते, पार्किंग आणि पाच नंबरची बिल्डिंग, दोन नंबरचा फ्लॅट, आमची खोली, कपाट, व्हरांडा, बाग नि मनमुराद जगणं आम्ही पुन्हा ‘आमच्या’ खोलीत गेलो. भिंतींवरून हात फिरवला. खिडकीतून डोकावलं. कपाट, बेडचे स्पर्श. सगळं अगदी काल घडल्यासारखं डोळ्यासमोर होतं. पण तिथे नव्हत्या ते या सगळ्याचा अनुभव घेऊ देणाऱ्या आमच्या आजी. आमच्या पार्टनर इन क्राइम. भरभरून प्रेम करणाऱ्या, कमालीची काळजी करणाऱ्या, हक्काने ओरडणाऱ्या नि मायेने जवळ घेणाऱ्या आमच्या केळकर आजी. आयुष्य घडवणाऱ्या, बदलणाऱ्या आणि जगण्याकडे वेगळ्या नजरेतून बघायला शिकवणाऱ्या आठवणी या सगळ्याशीच नि मुख्यत: आजींशी जोडलेल्या आहेत आजही!

प्रत्येकाच्या आयुष्याचा मंतरलेला एक काळ असतो. माझ्या नि आदितीच्या आयुष्यातली तशी ती वर्ष. जगाला बेदखल करून भिडण्याची वृत्ती बाळगणारा तो बेभान काळ. पत्रकारिता करण्यासाठी रानडेमध्ये प्रवेश घेतला. मी अदिती परांजपे, नाशिक. अशी अत्यंत माजात तिने ओळख करून दिली आणि बस हिच्याशी मैत्रीच करायची म्हणून मी पण चंग बांधला. पाच-सात दिवसांत गप्पांपर्यंतही आलो असू. आदितीने मुक्कामाची ठिकाणं बदलत आनंदनगर गाठलं नि त्या पाठोपाठ मी ही. आनंदनगरच्या टू बीएचके फ्लॅटमधील एक खोली म्हणजे आमचं हक्काचं विश्व होतं. बाहेर रहायला गेलीस की घराची किंमत कळेल नि शिस्त लागेल, असा सर्वसाधारण विचार करत आईने पुण्याला पाठवलं होतं. पण झालं उलटचं. हातने कपडे नका ग धुवू मुलींनो, मशिन लावा. बोर्नव्हिटा दूध की काय घेताय? नाश्त्याला काय करू? जेवायला आहात ना? किती वेळ झोपलीये यामिनी, ऊठ आता. वेळेवर उठावं गं अशा हक्कानं सूचना करणाऱ्या नि सतत आमच्या दिमतीला असणाऱ्या आमच्या केळकर आजी इथे भेटल्या. आम्ही नावालाच पेइंग गेस्ट. नोकरीमुळे आईनेही केले नसतील इतके लाड नि कौतुकं आजींनी सांभाळली. आमच्या कॉलेजच्या, भटकण्याच्या, बागडण्याच्या, गप्पांच्या, नोकरीच्या, सिनेमा-नाटकाच्या, शॉपिंगच्या सगळ्या वेळा त्यांनी सांभाळल्या. हाताबाहेर जातोय वाटलं की रुसवा धरला. ओरडल्या. पण पुन्हा आमच्या गाडीवर बसून भटकंतीला तयार झाल्या. ‘एज इज जस्ट अ नंबर’ असं ज्यांना अचूक लागू झालं अशा आजी.

रात्रीचे १२ वाजले होते. पुण्यातील आनंदनगर सोसायटीच्या प्रवेशाचं मागचं गेट बंद करून सुरक्षारक्षक गाढ झोपलेला. बरं आम्ही तिघी गेटवर उभ्या नि पुढच्या गेटने जायचं तर मोठा वळसा. मी आणि आजी गेटवर उभ्या राहिलो आणि आदिती गेटवरून उडी मारून जाऊन चावी घेऊन आली. इतक्या रात्री दोन गाड्या घेऊन आम्ही तिघी ‘आयुष्यावर बोलू काही’ बघून अवतरलो होतोमाझं संदीप खरे नि कविता प्रेम पाहून खास माझ्यासाठी त्यांनी केलेला हा प्लॅन आम्हा तिघींचं मस्त जमलेलं त्रिकुट.. मी आदिती आणि आजी. नाटक, सिनेमा, हॉटेलिंग, भटकंती, खरेदी, गप्पा, शेअरिंग नि भेळ-पाणीपुरी कशाकशासाठीही आमच्या हक्काच्या पार्टनर होत्या.. केळकर आजी!
कासटचा साडीचा सेल लागलाय का बघ ग संध्याकाळी आल्यावर जाता-येता बघितला का बोर्ड हा पुन्हा प्रश्न दुसऱ्या दिवशी पुन्हा आठवण मग तिसऱ्या दिवशी मी आणि आजी सेलच्या पहिल्याच दिवशी दुकानात दाखल. क्रीम कलरची प्युअर सिल्कची साडी आणि दोन कॉटन साड्या घेऊन आम्ही बाहेर पडलो. चार दिवसांनी भेट देण्यासाठी पुन्हा कासट कासटचा मान्सून सेल नि आजींची खरेदी हे समीकरणच.
क्रीम, ऑफ व्हाइट, ग्रे हे आवडते रंग नि प्युअर सिल्क आणि प्युअर कॉटन हे आजींचं प्रेम. माझंही साडीप्रेम त्यांना माहित असल्यानं आमचं मस्त जमायचं. मी साडी नेसायची म्हटलं की अख्ख कपाट खुलं नि मनसोक्त निवड रंगायची. तुला हव्या त्या साड्या घेऊन जा गं तू नेसते ना.. कपाट भरलंय. मला काय करायच्यात इतक्या. आजींचं हे सतत सांगणं अगदी लग्न झाल्यावरही!

महिला पत्रकारांच्या अधिवेशनासाठी मी बेंगलोरला जाणार होते. दुपारी बाराच्या सुमारास गाडी होती. आजी सकाळीच उठल्या. बटाट्याची भाजी-पोळी सकाळसाठी, संध्याकाळसाठी मेथीचे पराठे, फोडणीची मिरची, दही-भाताची बुत्ती बरोबर, चिवडा, बस्किटे नि काय काय.. माझी प्रवासाची बॅग भरण्याआधी आजींचे सगळे डबे तयार होते. हे सगळं घेऊन जा.. ट्रनेमधलं खाऊ नको आणि पोचलीस की नक्की फोन करून कळव आजींचं जाईपर्यंत सूचना देणं सुरू होतं नि येईपर्यंत काळजी.

तुला ही भाजी आवडत नाही ना, मग दुसरी करते काही थांब दररोजच्या जेवणासाठी आजींचे खास पर्याय असायचे. आईनेही असले चोचले पुरवले नव्हते. पण आजी हौसेने करायच्या. आजींच्या हातची उकड, खाराची मिरची, उंदियो, पुरणपोळ्या नि काय काय आजी खरंच सुगरण होत्या नि हौसेने करायच्याही. मुलींनो बोर्नव्हिटा संपलाय.. आणा की मी आणू? अगं अजून दूधही घेतलं नाहीयेस रात्री आल्यावर ११ वाजता जेवणारेस ना आजींच्या सूचना नि काळजी सुरूच रहायची. एखाद दिवस अगदी ठरवून आज मी काही करणार नाहीये. मॅगी आणून खा. नाहीतर सरळ बाहेर खाऊन या हे ही त्या हक्काने सांगायच्या. खोलीतला माझ्या बेडवर असलेला कपड्यांचा ढिग मशिनला लावायच्या नि कपडे सुद्धा धुवत नाही ही यामिनी वेळेवर म्हणत आता वाळत टाक अशी सूचना वजा आज्ञा द्यायच्या. खोलीतला पसारा आवरा असं सांगून थकल्या की स्वत:च सगळी आवरसावर करायच्या.

हा प्रसंग तर आजही जसाच्या तसा आठवतो. मला अचानक मासिक पाळीचा भीषण त्रास सुरू झाला. रात्रीची वेळ होती. मी आणि आदिती अक्षरश: बसून होतो. काही वेळाने बाथरूममधून बाहेर येणेच अशक्य झाले. मध्यरात्रीची वेळ असल्याने काय करावे तेही सुचेना. आजी बाथरूमच्या बाहेर येरझाऱ्या घालत होत्या. अखेर न राहावून त्यांनी दोन वाजता आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डॉ. रोडेंना फोन केला नि काय करता येईल विचारले. अख्खी रात्र बसून काढली. पहाट झाल्यावर आईला फोन केला नि परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी औषध देऊन थोडा फरक पडला की मगच पाठवणार असं आईला बजावलं. उपचार सुरू केले नि थोडं बरं वाटतंय हे कळल्यावर मला घराबाहेर पडू दिलं. अख्खी रात्र अस्वस्थ होत आईच्या मायेनं काळजी करत जागत राहिल्या.

यामिनी तुझं वजन वाढायलाच हवं काय ती हाडं दिसताहेत. दिवसभर फिरायचं तर तब्येतीची साथ नको? हे बारीक वगैरे नाही चालणार गं.. खायचं प्यायचं वय तुमचं झोपा जरा कमी कर गं आणि खाणं, वाचन, पेटिंग आणखी कशात मन रमवावं असा सूचनांचा डोस देत आजीच काहीतरी पुढे करायच्या. हे पेटिंग जरा पूर्ण कर, या कापडावर डिझाइन काढून दे आणि रंग घेऊन ये, आपण हे विणूया का.. सतत उत्साहात राहण्याचा त्यांचा स्वभावच.

पत्रकारितेच्या कोर्समध्ये मी आणि आदिती उत्तम गुणांनी पास झालो नि आजींना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या लेकांना फोन करून दोघी मुली पास झाल्याची बातमी दिली. आमच्या घरी फोन केले. लगोलग दुकानात जाऊन आमच्यासाठी ड्रेसचे कापड घेऊन आल्या. दोन्ही मुलांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि छानशा हॉटेलात जेवायला नेऊन आमचा कौतुकसोहळा झाला. आईबाबांना झाला असेल त्यापेक्षाही कितीतरी जास्त त्याच आनंदी होत्या. माझ्या घरात राहून मुलींनी चांगलं यश मिळवलं, याचंच केवढं समाधान होतं त्यांना. पत्रकार म्हणून नोकरी सुरू झाली नि आजींना कोण अभिमान वाटू लागला. येणाऱ्या प्रत्येकाला आमची ही मुलगी पत्रकार आहे. माझ्याकडे राहत असतानाच कोर्स केलाय तिने. खूप छान लिहिते. पेपर वाचत जा, नाव येतं तिचं वगैरे भरभरून कौतुकाने त्या सांगतच राहिल्या. न आवडणाऱ्या गोष्टी मुद्देसूद मांडत राहिल्या.

रानडे इन्टिट्यूटमध्ये असताना आम्हा चौघांचा ग्रुप होता. दोन मुले नि आम्ही दोघी. आनंदनगरचं पार्किंग, स्कुटीच्या फेऱ्या असे आम्ही भन्नाट भटकायचो. गाड्या यायच्या आधी पीएमटीचा पास काढून पुण्यात कुठूनही कुठेही जायचो. वर्षभर यथेच्छ टाइमपास केल्यावर परीक्षेचे दिवस दिसू लागले नि रट्टे मारायला सुरुवात झाली. आमच्या घरामागे असलेल्या बेंचवर बसून आमची लास्ट मिनिट तयारी, शोधाशोध सुरू होती. दोन मुलांबरोबर आम्ही बसलोय म्हणल्यावर सिक्युरिटी गार्ड नाराज झाला नि वादात पर्यवसन झाले. आजी पदर खोचून बाहेर आल्या आणि माझ्या मुलींना काही बोलायचं नाही असं निक्षून सांगून तुम्ही करा ग अभ्यास मी चहा देते करून म्हणत गार्डला हुसकावून गेल्याही. 

आमची मित्रमंडळी, गप्पा, कल्ला आनंदनगरच्या पार्किंगपासून ते आजींच्या घरापर्यंत सगळीकडे चालायचा. आजी आम्हा चौघांचा पाचव्या भिडू झाल्या होत्या. तुमच्या मित्रांचं काय चालंलय, असं त्या आवर्जून विचारायच्या. दोन पिढ्यांचं अंतर गळून पडत आम्ही मैत्रिणी झालो होतो. दुर्गाच्या कॉफीपासून ते सिनेमापर्यंत आणि क्रिकेटच्या मॅचपासून ते भरताकामापर्यंत असंख्य विषयांवर आमच्या गप्पा, देवाणघेवाण सुरू असायची. रविवारी मिळणाऱ्या पॅटिससाठी त्या रांगा लावायला सांगताना पक्क्या पुणेकर असायच्या. पण एरवी बोलताना दर चार वाक्यांनंतर त्यांच्या शिवाजी पार्कातील घराचा नि आठवणींचा उल्लेख यायचा. आजींच्या प्रत्येक नातेवाईकांसाठी आम्ही त्यांच्या घरातल्याच दोन मुली झालो होतो.

आजींच्या दोन गोष्टी खूप गंमतीदार होत्या. आजींना सकाळी फिरायला जायचा कंटाळा यायचा नि टीव्ही बघण्याचा स्टॅमिना कमालीचा होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिरायला जावे लागे. पण ते टाळण्यासाठी रोज इतकी कारणं शोधायच्या की आम्हालाच हसू यायचं. कधी उठून आवरलं नि कंटाळा आला, असे तर कधी पावसाने चिकचिक झालंय म्हणून.. टीव्ही म्हणजे दिवसदिवस न हलता त्या बघू शकायच्या नंतर चार दिवस रिमोट न बघता त्या काढायच्या. एक अजब रसायन होतं त्या.

आमच्यासारख्याच बाहेर राहणाऱ्या इतर मुलींचे अनुभव भीतीदायक होते. त्यामुळे आमच्यासाठी हे आयुष्य म्हणजे चैन होती. नातं जोडणं, आपलं मानणं, त्यासाठी जीव टाकून काही करणं, हे प्रत्येकाला जमत नाही. देतानाही हातचं राखून देतो. पण आजींनी त्यांच्या स्वभावाने, आपुलकीने असंख्य माणसं जोडली होती. रक्ताच्या नात्यापल्याडची. आम्ही त्यातल्याच एक. त्यांचं असं असणं आम्ही अनुभवलं म्हणून. एरवी आपण विश्वासही ठेवला नसता. परक्या शहरात अडनिड्या वयातील मुलींना आपलं म्हणत रहायला देणं, तेही आर्थिक गरज नसताना. हेच अविश्वसनीय. त्यातही इतकं निर्व्याज प्रेम आमच्या वाट्याला येणं, हा व्यक्त न करता येणारा अनुभव. आदितीने खूप काळ त्यांच्याबरोबर घालवला. मी जेमतेम तीन वर्षे होते. पण तीन वर्ष पुढची ३० वर्षे मी कसं जगावं, याचा मार्ग दाखवणारी ठरली. नोकरी ठीकच. पण बरोबर मी अभ्यास करावा, एमए करावं, वाचावं असा आग्रह धरणाऱ्या, परीक्षेचे टाइमटेबल लिहून घेणाऱ्या, माझ्या लग्नानंतर लोणच्यांपासून मसाल्यांपर्यंत सारं काही हौसेनं देणाऱ्या आणि हे तुझंच घरं आहे, कधीही ये असं हक्कानं सांगणाऱ्या आमच्या केळकर आजी.

आजी गेल्याचा निरोप आल्यानंतर आज चार-पाच वर्षांनीही त्यांचा नंबर डिलिट करू शकले नाही. परवा आनंदनगरला आम्ही खास आमच्या आठवणीतील आजींना शोधायला गेलो. मेघनाताईला किती कारनामे सांगितले. आजींचं आमच्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचंय, हे सतत सांगत होतो. त्या घरात, त्यांच्या स्वयंपाकघरात असलेल्या छोट्या छोट्या आठवणींतून आजी आम्हाला पुन्हा भेटल्या. तितक्याच आपुलकीनं, प्रेमानं नि आईच्या मायेनं. तुम्ही आहातच आजी. माझ्या आणि आदितीच्या मैत्रीत आणि आम्हाला दिलेल्या अविस्मरणीय क्षणांत!