सोमवार, १९ जानेवारी, २०१५

यहाँ के हम सिकंदर

समुद्राच्या लाटांची गाज मनात एक वेगळीच लय निर्माण करते. त्या लयीचा, लाटेने निर्माण होणाऱ्या खळबळीचा, किनाऱ्यावर निवांतपणे विसावण्याचा एक वेगळाच सिलसिला असतो. आधीची खळबळ आणि त्यानंतर येणारं विसावलेपण हा अनुभवच वेगळा…

नदी मूळातच शांत, संयत प्रवृत्तीची… तिचा प्रवाहही असाच निर्मळ.. खळबळ तिचा स्थायीभावच नाही… पण तरीही अडकून रहायचं नाही, साचलेपण येऊ द्यायचं नाही… प्रवाहीपण सोडायचं नाही, हा तिचा नेम.

निसर्गातील या दोन वाहिन्या मानवी स्वभावाच्या अगदी जवळ जाणाऱ्या. नेमकं कस असावं, याच उदाहरण देणाऱ्या… खरं तर हे सारं तात्विक, जीवनाचं सार वगैरे कुठुन आलं अचानक असं माझं मलाच वाटून गेलं. पण, देनवा नदीच्या शुभ्र, स्वच्छ खळाळत्या पाण्याने थोडंस अंतर्मुख केलं आणि रोज भेटणारा समुद्र आणि देनवा मनात घर करून राहिले. ही देनवा नदी भेटली ती निसर्गाचा असाच अद्भुत अविष्कार असलेल्या जंगलाच्या सफारीवेळी एक स्वतंत्र, न्यारी आणि विलोभनीय दुनिया.

सुंदरबन, ताडोबाची सैर केल्यानंतर निसर्गाच्या या रूपाकडे बघण्याची एक दृष्टी मिळावी. त्यामुळेच सातपुडा जंगल, तिथला निसर्ग, प्राणी, पक्षी यांना न्याहाळताना यावेळी केवळ भारावलेपण नव्हतं. मनात अनेक विचार, आपल्या रोजच्या आयुष्याशी असणारं येथील जीवनमानाचं जोडलेपण, असं बरंच काही मनात आलं.

येथे मुक्त विहार करताना भेटणारे अनेक प्रकारचे पक्षी, त्यांची लोभस रूपे, त्यांचा मुक्त विहार, त्यांचे स्वातंत्र्य याचा प्रत्येकाला हेवा वाटावा. जंगलातील झाडांचे वैविध्य, त्यांची प्राण्यापक्षांशी जोडली गेलेली नाळ, आभाळाकडे झोपावतानाही जमिनीत पाय घट्ट रोवून उभे असलेले वृक्ष, नुकताच पावसाळा संपल्याने चौफेर असलेली हिरवाई… हे सारंच आल्हाददायक. मनाला ‘हिरवं’, ‘ताजतवान’ करणारं.

सातपुडा जंगलाकडे जाणारी वाट ही देनवा नदीतील. या नदीत पहाटे सूर्योदयाच्यावेळी पाण्यात पडणाऱ्या तांबूस रंगाच्या किरणांचे प्रतिबिंब. लालसर तेजानं व्यापलेलं आकाश. दूरवर नदीचे पाणी आणि आकाशाची भेट होत असल्याचा आभास, सारं मनात घर करून राहतं. या पाण्यातून जाणारी वाट जंगलाबाबतचे औत्स्युक्य वाढते. जंगलात प्रवेश करताना, स्वागत करणारी हसरी कमळे, मोर, हरणांचे ताफे त्यांच्या साम्राज्याची झलक दाखवतात. या सफारीचे कुतुहल वाढवतात.

वाघाला जंगलाचा राजा का म्हणतात? त्याचे दर्शन अद्भुत का? ‘टायगर लक’ खरंच असावं लागतं? या साऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याची एक झलक दिसली तरी आपोआप मिळते. त्याचा रूबाब, त्याचा वेग, त्याचे राजेपण आणि त्याची शान… विलोभनीय! सातपुड्याला पहिल्याच सफारीच्या सुरुवातील अशी रूबाबदार सलामी मिळाली आणि राजेपणाचं दर्शन घडलं. जंगलातून रूबाबात येणारा आणि समोरच्याला खिजगण​तीतही न धरता आल्याचे ऐटीत निघून जाणारा वाघ पाहिला आणि सातपुड्याला येणं सार्थकी लागलं. आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट अनपेक्षितपणे मिळाली की जो आनंद होतो, तोच आनंद व्याघ्रदर्शनानेही मिळतो.

जंगल सफारीतील अनुभव, तिथलं जीवनमान याचा विचार केला तर ही सफारी आपल्याला निर्व्याज आनंद म्हणजे काय, प्रयत्नाने आणि पुरेशा प्रतीक्षेने एखादी गोष्ट मिळवण्यातलं समाधान काय आणि सगळ्यात महत्त्वाचं न मिळालेल्या गोष्टीने न हिरमुसता प्रयत्नातील आनंद अनुभवायला शिकवते. नव्याने शोध घेण्याची उर्मी कायम राखण्याचे धडे देते.

जंगलातील प्राणी धोक्याचा इशारा म्हणून देत असलेले ‘कॉल’ ऐकत जंगल प्रदक्षिणा झाली. जंगजंग पछाडलं. तेव्हा कुठे दूरवर झाडाखाली ‘बिबळ्या’च रूप दिसलं. तेही दुर्बिणीतून! म्हणजे तुम्ही आलात आणि आम्ही तुमचे स्वागत करायला सलामी देतो, असे शहरातल्या वातावरणात होत असलं, तरी नेहमी असं घडणार नाही. इथे आमचे नियमच चालतात. याची जाणीव त्यांनी करून दिली.

रोजचा कामाचा व्याप, घड्याळाच्या काट्यावर बांधलेलं आयुष्य यातून काढलेली फुरसत आल्हाददायीही हवी आणि काही मिळवल्याचा आनंद देणारीही. सातपुड्यात निसर्गाच्या चौफेर वेळ्यात मिळालेला निवांत विसावा, सूर्योदय-सूर्यास्त बघण्याचं भाग्य आणि जंगलदर्शन… सारंच प्रफुल्लित करणारं. संध्याकाळच्या वेळी हातात निवांत कॉफीचा कप, समोर वाहणारं नदीचं पाणी, सुखद गारवा, ‘प्रदूषण’ नसलेली हवा, हे सुख तरी कुठे असतं रोजच्या आयुष्यात? स्वतःसाठी काढलेला हा वेळ त्यामुळेच वेगळा ठरला. नवे मित्रमैत्रिणी, जुन्यांचा सहवास, त्यांचे अनुभव, मजा, थट्टा-मस्करी वातावरणं हलकफुलकं करणारे. तर जुन्या आठवणी नव्याने जगण्याची संधी देणारा मैत्रिणीचा सहवासही तितकाच आपलेपणाचा!

पक्षांचे प्रकार, त्यांचे बारकावे, रंग, रूप, वैशिष्ट्य यांची अचूक माहिती असणारे आणि ती देण्याची तयारी असणारे ‘साथी’ मिळणंही भारी. एखादा पक्षी दिसेपर्यंत थांबायचे, तो प्रत्येकाला दिसावा म्हणून अट्टहास ठेवायचा, त्याला न्याहाळायचे आणि निघायचे हे सारे वेगळा अनुभव देणारे. त्यामुळेच पक्षी आणि त्यांची ओळखही आनंददायी ठरली, ती त्यासाठी झपाटलेपण असलेल्या मंडळींमुळे!

रात्रीच्यावेळी जंगल कसं दिसतं? काय हालचाल असते? घनदाट झाडीत जंगल दिसतं? या साऱ्या प्रश्नांची एकल करणारी सैरही अनुभवायला मिळाली. रोजच्या नाइटशिफ्टने ‘रात्री’चे भय नाहीसे केले असले तरी जंगलातील रात्री मनातून थोडीतरी घाबरवणारीच. एरवी दीड-दोन वाजलेत वाटावं असं नऊ-दहा वाजताचं वातावरण. निरव शांतता, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आपापले आवाज, झाडाच्या पानाची सळसळ अशी सारी हालचाल… जंगलातील ‘अवघड’ वाटेवरून धावणारी गाडी आणि बॅटरीच्या झोतात भिरभिरणाऱ्या नजरा… मस्त माहोल. आत्ताच सुरू झाली आहे अशी वाटणारी दोन तासाची सफारी संपते तरी कळत नाही.

एकूणच आयुष्यात फुरसतीचे मिळणारे दोन क्षण कृत्रिम हवेत घालवण्यापेक्षा मोकळी हवा भरून घ्यायला निसर्गाकडे यायला हवं.  त्याच्या अटीवर, त्याला शरण जायला हवं. हे त्याचं राज्य, त्याचं जग आणि इथे फक्त निसर्गाचे इशारे चालतात, हे मान्य करण्यासाठी यायला हवं. कधी मिळणारं भरभरून दान, कधी रिते हात, कधी प्रतीक्षा, कधी हुरहुर सारं ‘स्वीकारण्याची’ तयारी जोखण्यासाठी यायला हवं. सातपुड्याच्या अनोख्या जंगलानं अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. केवळ सफारीचा आनंद, सहलीची मजाच नाही तर वेगळी दृष्टी, दिशा दाखवली. आपल्या चकचकीत एसीच्या हवेतून खुल्या आकाशात फिरण्याचा निर्भेळ आनंद दिला. नवी उर्मी मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा येण्याचा निर्णय परतेपर्यंत निश्चित झाला होता.

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

थांबवा हा उन्माद


दहीहंडीच्या सरावादरम्यान सानपाड्यात १४ वर्षांच्या बालगोविंदाला पाचव्या थरावरून पडल्यामुळे जीव गमवावा लागला. किरण तळेकर या लहानग्याला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी या खेळाबाबत संताप व्यक्त केला. पण आपल्या मुलाला अशा जीवघेण्या खेळाकडे जाण्यापासून रोखण्याची जबाबदारीच खरं तर त्यांची नव्हती का?
या घटनेआधीच तीन दिवस मुंबईत करी रोड येथील एक तरुण थरावर पडला आणि मानेला गंभीर जखम झाली. त्याच्यावर ऑपरेशन करण्याची वेळ आली. या घटनेनंतरही बालगोविंदांना दहीहंडीत खेळवायचेच, राजकीय आग्रह, मंडळाची हटवादी भूमिका हे सारं सुरू झालं. दुर्घटनेनंतरही आत्मपरीक्षण करण्याचा विचार नाही, इतका हा उन्माद फोफावला आहे.
छोट्या वाडीमध्ये, चाळीमध्ये वेगवेगळ्या घरातील मुलांनी, तरुणांनी एकत्र येत दोन तीन थरांची छोटेखानी दहीहंडी रचत, या सणाचे मर्म असलेल्या मस्त दहीकाल्याचा आस्वाद घ्यावा, इतकं माफक खरं तर या सणाचे महत्त्व. छोट्याशा हंडीत असणारा इतकासा कालाही सगळ्यांनी वाटून घेत खाण्याची सवय लावणारा आणि देण्यातील आनंद शिकवणारा हा सण. त्यातही एकमेकांवर थर लावताना दुसऱ्याबाबत असलेला विश्वास, खात्री दृढ व्हावी, जबाबदारी घेण्याची सवय लागावी, असाही एक त्यामागचा दृष्टिकोन. पण काळानुरूप जसे इतर सणांचे अवडंबर माजून त्यामागचा मूळ दृष्टिकोन लयास गेला. तसेच दहीहंडीचे झाले. या सणातील दहीकाल्याची मुलांना वाटणारी मजा जाऊन त्याची जागा आधी स्पर्धेने आणि आता राजकीय चढाओढीने घेतली आहे. निखळ आनंदाऐवजी त्यात पैशाची बाजू वरचढ झाली.
दहीहंडीमध्ये या आर्थिक स्पर्धेबरोबरच थरांच्या उंचीची स्पर्धाही रंगू लागली. नऊ, दहा अशा या थरांसाठी मग लहान मुलांचा सहभागही अपरिहार्य झाला. अगदी तीन वर्षांपासूनच्या मुलांनाही या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाऊ लागले. वजनाने हलकी असलेली ही मुले वरच्या थरांसाठी उपयुक्त ठरू लागली आणि लहान मुलांना वेठीस धरण्याची स्पर्धाच जणू मंडळांमध्ये लागली.
दहीहंडीचे राजकीयीकरण झाल्यापासून त्याचे स्वरूपच बदलले. आधी मैदानात होणाऱ्या हंड्या आता रस्त्यावर, चौकाचौकात आल्या. त्यामुळे या खेळासाठी आवश्यक नियम, जागा, पद्धती सगळ्यांनाच फाटा दिला गेला. कुठल्याही खेळाच नियम असतात. त्यासाठी खास सुरक्षेची तयारी करावी लागते, ही बाब विसरून त्याचे उन्मादात रूपांतर झालेय आणि त्यामुळेच कुणीही जखमी होवो, कायमचे अपंगत्व येवो किंवा काही, आम्ही बदलणार नाही, अशी पद्धती आता रूढ झाल्याने लहान मुलांसह तरुणांचे जीव या खेळात टांगणीला लागत आहेत.
दहीहंडीच्या या स्वरूपाविरोधात अनेकांनी कोर्टात धाव घेतली. माध्यमातून चर्चा झाल्या. कुणी उघडपणे तर कुणी मनातून सध्या सण ज्या पद्धतीने साजरा होतो, त्या पद्धतीला विरोध करू लागले. त्यांच्यातीलच एक असलेल्या पवनकुमार पाठक यांनी बालहक्क आयोगाकडे मुलांच्या हिताच्या दृष्टीने धाव घेतली. या खेळात लहान मुलांच्या सुरक्षेचा कोणताही विचार होत नाही. लहान वयात झालेल्या इजांचे आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात, कुणाला कायमच अपंगत्व येऊ शकतं, तसेच उंचीवरून पडल्याने असणारा मानसिक धक्काही मोठा असतो, याकडे या तक्रारीतून लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला आहे. बालहक्क आयोगानेही या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेत १२ वर्षांखालील मुलांना सहभागाची बंदी घातली आहे. मात्र त्यावर सणांतील हस्तक्षेप असा कांगावा करत नियमभंग करण्याचा हट्ट मंडळांनी धरला. राजकीय उंबरे झिजवले. मोठमोठ्या वल्गना केल्या. मात्र निवडणुका लक्षात घेत सरकारने भूमिका जाहीर करणे टाळून सकारात्मक ​भूमिकाच घेतली आणि मंडळांना दोन पावले मागे जाणे भाग पाडले.
डांबरी रस्त्यांवर प्रचंड गर्दीत मुलांना असे थर लावत आठव्या, नवव्या थरावर चढवले जाते. त्यामुळेच त्यांच्या जीवाला असलेला धोका वाढतो. बालहक्क कायद्याच्या सेक्शन ८४ अन्वये मुलांची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. मुलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या पालकांसह इतरांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळेच या खेळात मुलांना सहभागी करून घेणारे आयोजक, मंडळे यांच्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेशी खेळणारे पालकही तेवढेच जबाबदार मानले जाणार आहे. याप्रश्नी आयोग १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना या खेळात सहभागी होण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाला अनेक थरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा निर्णय केवळ मुलांची सुरक्षा आणि हितासाठीच असेल, अशी ठाम भूमिकाही आयोगाने घेतली आहे.

या बंदीचा अर्थ कुठलेही सणच साजरे करू नका, साहसी, धाडसी खेळच मुलांनी खेळायचे नाही असा नक्कीच नाही. मात्र प्रत्येक धाडसी खेळाचेही काही नियम, अटी असतात. असे खेळ खेळण्याची योग्य जागा, आवश्यक तो पुरेसा सराव, सातत्य आवश्यक असते. मुख्य म्हणजे त्यात हुल्लडबाजीला थारा नसतो. मात्र केवळ राजकीय स्पर्धेपोटी महिन्याभराच्या सरावावर भर चौकात असे जीव टांगणीला लावणे, याचे संस्कृतीच्या नावाखाली समर्थन कसे होऊ शकते?
सानपाड्यातील बालगोविंदाचा गेलेला जीव, आजवर अनेक तरुणांची एक प्रकारे झालेली हत्या आणि जखमी अवस्थेत अनेकांचे टांगणीला लागलेले जीव या साऱ्याचाच एकत्रित विचार करून सणाच्या नावाखाली चाललेल्या हुल्लडबाजी आणि उन्मादाला आता आवरायलाच हवे. त्यादिशेने बालहक्क आयोगाने घातलेल्या नियमांच्या पुढे पाऊल टाकत सरकारने चौकाचौकातील थरांच्या जीवघेण्या स्पर्धेवर बंधने आणून चांगला पायंडा पाडावा आणि सणांचे ‘आनंदी’ स्वरूप टिकवावे, ही अपेक्षा




गुरुवार, २६ जून, २०१४

अन्याय भिरकावलेली…


भर दुपारची वेळ लोकल, लोकलमधील प्रवासी सारेच थोडे सुस्तावलेले. एवढ्यात महिलांच्या डब्यामध्ये असणाऱ्या दोन विक्रेत्या महिलांचा संवाद कानावर पडला. संवादच तो. सुखदुःखाची वाटणी. अश्रूला वाट करून द्यायची नी पुन्हा पदर खोचून उद्योगाला लागायचे. त्यातील एक जण अगदी पंचवीस ते तिशीच्या आसपासची. ती नवरा, घर असं काही बोलू लागली अन् अचानक अश्रू अनावर झाले. थोडा वेळाने आवंढा गिळला आणि संतापानेच कर्मकहाणी सांगू लागली.
नवरा गवंडीकाम करतो. दारूचे व्यसन आहेच.  आज काम तर उद्या नाही, अशी गत दारूला पैसाही हिच्याच पदरचा. दिवसभर लोकलमध्ये काहीबाही कमावून जे मिळवायची त्यातून पोरींना दोन घास खाऊ घालत होती. त्यातूनही काही, नवऱ्याच्या दारूसाठी.  हे सारं मान्य करत संसाराचा गाडा ती रेट होती. पण दोन मुलींच्या पाठीवर तिसरी मुलगीच झालीअन् सारं बिनसलं. नवऱ्याने दुसरा घरोबा करत तिला तीन मुलींनिशी हाकलून दिलं माहेरी अठराविश्व दारिद्य्रत्यामुळे तिथे आसरा मिळणं कठीणच. आता गोवंडीला शेजार पाजारांच्या आधाराने राहातेय पण पदरात असलेली तीन मुलींसह जगणं, उभं राहणं त्यात नवऱयाने टाकलेली हेबिरूदसोबत घेत, अनेक नजरा झेलत, चुकवत जगायचं म्हणजे कधी तरी अवसान गळायचंच तिची कहाणी ऐकून हादरले मुलाच्या हट्टापायी अशा कितीतरी शेवंतांना आज बेघर व्हावं लागलंकुणी आत्महत्या केल्या, कुणी लाचारीचं जिणं आपलं मानू लागल्या पण या शेवंतामध्ये मला वेगळीच चमक दिसली.
लोकलमध्ये आपल्या सखीशी बोलता बोलता अचानक अश्रू तिने आवरले नवऱयाने टाकलं म्हणून काय झालं? नाहीतरी घर मीच चालवत होते. त्याच्या दारूलाबी पुरत होते. माझ्या तीन पोरींना मी वाढवेन, समाजापासून, वाईट नजरांपासून जपेन. त्यांचा बाप नी माय दोन्ही होईन, पण जीव नाय देणार आणि त्याच्या पायाशी बी नाय जाणारसंकटाचा डोंगर कोसळला असतानाही ताठ उभं राहण्याची तिची जिद्द पाहून चमकले. तिन्ही मुली तिच्या भोवती फिरत होत्या. फाटके फ्रॉक घातलेल्या अनवाणी, काहीशा भुकेलेल्या आणि  सगळ्याच प्रसंगांमुळे भेदरलेल्या एकाच वेळी मी सुन्न झाले, संताप आला, कौतुक वाटलं आणि त्या मुलींच्या आजच्या अवस्थेमुळे काळजीही वाटली.
ताई आता मी माझ्या दूरच्या आत्याला बोलावलय माझ्याकडे रहायला गोवंडीत झोपडं मिळालय ती पोरींना तर सांभाळेल. मी इथे माझी काम करेन. सकाळी भाजी पण विकणारे जेवढं जमेल तेवढं करेन. पोरींना शाळेत पण घायलाचंय तिच्याजवळ तिला काय करायचंय हे सारं तयार होतं आणि महत्त्वाचं कुणापुढे हात पसरायचे नव्हते स्वाभिमानाने जगायचं होतं. परिस्थितीच्या तडाख्याने ती हाललेली पण कोलडून पडली नाही. त्या परिस्थितीला शिंगावर घेत लढायला तयार झाली. कुर्ल्यात ती उतरूनही गेली पण माझ्या डोळ्यासमोरचीतिची १५ मिनिटांत दिसलेली वेगवेगळी रूपं हलत नव्हती. मी तिला दुसऱ्या दिवशी त्याच लोकलला नक्की भेटायला सांगितलं..
दुसर्या दिवशी आमची भेट झाली भाचीने केवळ कंटाळा आला म्हणून फेकलेले बूट, तिचे तिला काही फ्रॉक, माझे काही बरे ड्रेस अशी पिशवीच तिच्या हातात ठेवली यात नवं काही नाही, पण तरीही तुला कामात येईल वाटलं म्हणून आणलं तिच्या मुलींसाठी सहजच थोडा खाऊ दिला. तिच्या चेहर्यावर आनंदाची, समाधानाची लकेर उमटली पुन्हा कुर्ल्यात उतरताना म्हणाली पैसे पुढे केले नाहीत, हे फार बरं झालं पण तुमच्या या मदतीने माझी काही काळाची अंग झाकण्याची आम्हा सगळ्यांची चिंता मिटवलीत दहा वेळा आभार मानत ती उतरली पण माझ्या नजरेत ती आणखी मोठी झाली
आज जगात अनेक शेवंता, त्यांच्या पातळीवर त्यांच्या लढाया समर्थपणे लढत असतील नाकारलेपणाच्या जगण्यावर थुंकून आपलं विश्व उभारत असतील त्यातल्याच एकीला मी ओळखते, ​याचं मला खरंच समाधान आहे छोट्या छोट्या गोष्टी न मिळाल्याने संतापणारे, अन्यायाची भाषा करणारे आपण आणि सगळच नाकारलेलं असताना ठामपणे उभे राहिलेली ती दोन्हीतलं अंतर, विचार लख्खपणे जाणवलं!!! खरं तर स्वतःत नव्याने डोकावण्याची गरज वाटली

सोमवार, २८ एप्रिल, २०१४

अस्वस्थता आणि हतबलता


अस्वस्थता आणि हतबलता
स्टेशनला येण्यासाठी रोज शेअर रिक्षाचा प्रवास नित्याचाच. रिक्षाने स्टेशनला उतरले की दहा रुपये द्यायचे आणि दोन रुपये पर मिळणार हे ही ठरलेलेच. पण हेच दोन रुपये मागण्यासाठी त्याचवेळी तीन चार हात सरसावतात. अत्यंत केविलवाणे चेहरे करून, भर उन्हात ही चिमुकली मुले उभी असतात. त्यांच्याकडे बघून अस्वस्थ वाटू लागतं. दोन रुपये दिले तर काय फरक पडेल, असा विचारही मनात येतो. पण त्यांच्या हातावर पैसे टेकवणे हे प्रश्नाचे उत्तर नाहीच, असं पुढच्याच क्षणी वाटतं.
रोज असे पुढे येणारे हात सतत अस्वस्थ करत असतात. स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच तान्ह्या बाळाला झोपवून त्याचा भाऊ पैसे मागत असतो. दोन-तीन वेळा या मुलांना बिस्कीटे, चणे-दाणेही दिले. पण त्यांचे आणि आपले क्षणिक समाधान एवढेच त्याचे फलित.  खूप अस्वस्थ वाटूनच माझा रोजचा प्रवास सुरू होतो. पण एका घटनेने मात्र तिडीक गेली या मुलांबाबतची अस्वस्थताही तितकीच वाढली.
एकदा अशीच दोन मुले भीक मागायला नकार देत होती. तर जवळच बसलेल्या त्यांच्या बाप दोन सणसणीत लगावून त्यांच्या अंगावर गेला. पैसा माँगना ही पडेगा, असे दटावू लागला. एवढी लहान मुले आणि त्यांना होणारी मारहाण खूप संताप झाला. त्याला दोन शब्द सुनावण्यासाठी गेले. हातीपायी धड आहात, तर तुम्ही काम करा, स्टेशनचे काम सुरू आहे, तिथे शेकडो कामगार काम करतात, तिथे तुम्हाला जायला काय होतं, असे अनेक प्रश्न त्याला विचारले. पण तो निर्विकार आपको पैसा देना है तो दे दो नही तो जाओ अपने रस्तेसे, असे उर्मटपणे सुनावले पैसे मागण्यासाठी केविलवाणे होणारे हेच का ते लोक, असं वाटू लागलं. ये धंदे मे अच्छे पैसे है बच्चे जितना रोएंगे, गिडगिडाएंगे उतना पैसा ज्यादा, ये सरासर हिसाब है, असे निर्लज्जपणे त्याने सांगितले. मुलांना कामाला लावलं तर पोलिसांत जाईन, असं म्हटल्यावर हसत म्हणाला, उनको पता है सब वो कुछ नही करेंगेमी हतबल. एकीकडे गाल चोळत टिप गाळणारी ती मुलं, भुकेपायी समोरच्याकडे पैसे मागण्यासाठी पुढे होणारे त्यांचे हात आणि त्यांचा निष्ठुर, उर्मट, बिनकामाचा बापकशाचाच अंदाज लागत नव्हता. त्या मुलांच्या वाट्याला आलेल्या अशा जगण्याबद्दल अधिकच खिन्नता, अस्वस्थता वाटत होती तर समाजातील या फुकट्या वृत्तीचा अतोनात संताप येत होता. त्या माणसाला जाहीर चार सणसणीत शिव्या देऊन चालते होणे, हाच पर्याय होता. व्यवस्थेच्या परस्पर सहकार्यसंबंधांमुळे अशा सामाजिक प्रश्नावर कायमचे उत्तर असे आपल्याकडे नाहीच ना पण आजही रिक्षातून बाहेर पडताना ते हात समोर आले की अस्वस्थ वाटतेच त्यालाही पर्याय नाहीच!